अक्षय टेमगिरे
शिरूर : शिरूर पोलीस स्टेशनसमोरच एका खाजगी फोर व्हीलर वाहनावर भारतीय राजचिन्ह (अशोक स्तंभ) असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर संबंधित वाहनावर कारवाई करण्यात आली. मात्र, केवळ 500 रुपयांचा दंड आकारून वाहन (एमएच 12 डब्ल्यू ई 1584) सोडून देण्यात आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी अधिकारी अथवा अधिकृत शासकीय वाहनांनाच भारतीय राजचिन्ह वापरण्याची परवानगी असते. मात्र, शिरूर पोलीस स्टेशनसमोरील परिसरात उभ्या असलेल्या एका खाजगी चारचाकी वाहनावर भारतीय राजचिन्ह लावण्यात आल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार पाहताच सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी तत्काळ पोलिसांना माहिती देत संबंधित वाहनावर कारवाईची मागणी केली.
यानंतर पोलिसांनी संबंधित वाहनाची पडताळणी करून दंडात्मक कारवाई केली. मात्र, केवळ 500 रुपयांचा दंड आकारून वाहन सोडण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खाजगी वाहनावर भारतीय राजचिन्ह लावणे हा गंभीर प्रकार असताना इतकी किरकोळ कारवाई का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
खाजगी वाहनांवर अशा प्रकारे भारतीय राजचिन्हाचा वापर केल्याने सामान्य नागरिकांची दिशाभूल होण्याची शक्यता असते. काहीजण प्रभाव निर्माण करण्यासाठी किंवा स्वतःला अधिकृत व्यक्ती असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी अशा चिन्हांचा वापर करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
विशेष म्हणजे, हा संपूर्ण प्रकार शिरूर पोलीस स्टेशनसमोरच घडल्याने नियमांच्या अंमलबजावणी बाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
पोलीस स्टेशनसमोरच नियमांना हरताळ फासला जात असेल, तर सामान्य ठिकाणी परिस्थिती काय असेल? अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केलीआहे.
दरम्यान, या घटनेनंतर शिरूर तालुक्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली असून, भारतीय राजचिन्हाचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात पोलिस प्रशासनाने ठोस आणि कडक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा शिरूरचे सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी व्यक्त केली जात आहे.






