पुणे : राज्यभरात सध्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ चांगलीच चर्चेत आहे. एका बाजूला विविध कारणांमुळे राज्यातील सुमारे 92 लाख महिलांना या योजनेचा हप्ता मिळणे बंद झाल्याने महिलांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तर दुसऱ्या बाजूला जळगाव जिल्ह्यातील सुमारे 2000 महिलांनी ‘आम्हाला ही योजना नको’ असे सांगत महिला व बालविकास विभागाकडे थेट अर्ज सादर केले आहेत.

शासनाच्या नियमानुसार एका लाभार्थ्याला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या सरकारी योजनांचा फायदा घेता येत नाही. जळगावमधील या महिलांना ‘संजय गांधी निराधार योजने’चा लाभ घ्यायचा आहे. या योजनेची मंजुरी मिळाल्यामुळे त्यांनी लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद करण्याची लेखी विनंती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ऋषिकेश काळे यांच्याकडे केली आहे.त्यामुळे या योजनेला मोठा धक्का बसला आहे

विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने या योजनेची अंमलबजावणी सुरू केली होती. त्यावेळी अर्जांची कडक छाननी करण्यात आली नव्हती. मात्र, आता नियमावलीची कठोर अंमलबजावणी केली जात आहे. उत्पन्नाची 25 लाख रुपयांची मर्यादा ओलांडणे, घरात चारचाकी वाहन असणे आणि e-KYC प्रक्रिया पूर्ण न होणे, अशा विविध तांत्रिक कारणांमुळे लाखो महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.
अनेक महिलांची e-KYC प्रक्रिया पूर्ण होऊनही तांत्रिक अडचणींमुळे त्यांना बँक खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे या महिलांना शासकीय कार्यालयांचे फेरे मारावे लागत असून त्यांच्यात तीव्र असंतोष पाहायला मिळत आहे. ज्या महिलांनी निवडणुकीत सरकारला पाठिंबा दिला, त्यांनाच आता कडक अटी व शर्तींमुळे योजनेपासून दूर राहावे लागत असल्याने महिला वर्गात नाराजी निर्माण झाली आहे.






