लोणी काळभोर, ता. १४ : पालखी सोहळ्याच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी पुन्हा एकदा हातचलाखीचा डाव साधला आहे. हडपसर गाडीतळ ते लोणी काळभोर दरम्यान सिक्स सीटर रिक्षातून प्रवास करणाऱ्या ५१ वर्षीय महिलेच्या बॅगेतील सोन्या-चांदीचे दागिने आणि २० हजारांची रोख रक्कम १२ जुलै रोजी लंपास केली आहे. त्याची चालू बाजार भावाप्रमाणे 6 लाख 20 हजारांहून अधिक रुपये किंमत होत आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिंधु लक्ष्मण सुकाळे (रा. सध्या पुणे, मूळ रा. सोनेगाव, ता. वाशी, जि. धाराशिव) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंधु सुकाळे या बहिणीच्या मुलाच्या लग्नासाठी पुण्यात आल्या होत्या. मुलगा प्रशांत याने शेतीच्या पेरणीसाठी दिलेले २० हजार रुपये आणि लग्नासाठी आणलेले सोन्या-चांदीचे दागिने त्यांनी पर्समध्ये ठेवले होते. त्या पिंपळे गुरव येथून बसने हडपसर गाडीतळ येथे उतरल्या. लोणी काळभोरला जाण्यासाठी बसची चौकशी करत असताना, सुमारे २४ वर्षीय एका अनोळखी तरुणीने “पालखीमुळे पीएमपीएमएल बस बंद आहेत, आपण रिक्षाने जाऊ” असे सांगितले.

यानंतर दोघी एका एमएच-१२ क्यूआर-५३०५ क्रमांकाच्या सिक्स सीटर रिक्षात बसल्या. रिक्षामध्ये आधीच चार महिला बसलेल्या होत्या. प्रवासादरम्यान समोर बसलेल्या महिलांपैकी एक वारंवार सीटवर हालचाल करत होती, तर तिच्या शेजारील दोन महिला साडीचा पदर वापरून बॅग झाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. कदमवाकवस्ती येथे उतरून मुलीच्या घरी गेल्यानंतर बॅग तपासली असता पर्समधील १८ ग्रॅमचे मिनी गंठण, १० ग्रॅमचे सोन्याचे मण्यांचे गंठण, १० ग्रॅमचे झुमके, नथ, कानातील वेल, ३०० ग्रॅम वजनाची चांदीची वाटी आणि २० हजार रुपयांची रोख रक्कम असा चालू बाजार भावाप्रमाणे एकूण ६ लाख २० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे उघड झाले.

या प्रकरणामुळे पालखीच्या गर्दीत सक्रिय असलेल्या महिला चोरट्यांच्या टोळीचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला आहे. भाविक आणि नागरिकांच्या गर्दीचा फायदा घेत अशा टोळ्या हातचलाखीने चोरी करत असल्याने प्रवाशांनी विशेष सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. लोणी काळभोर पोलिसांनी अज्ञात महिलांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही फुटेज, रिक्षाचालक आणि संशयित महिलांचा शोध सुरू केला आहे. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अशा टोळ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.







