दौंड, ता. ८ : चौफुला-न्हावरा मार्गावर अवजड वाहनांच्या बेदरकार वाहनचालकांमुळे अपघातांची मालिका सुरूच असून, दोन वेगवेगळ्या अपघातांनी पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पारगाव येथील २२ फाटा परिसरात भरधाव आयशर टेम्पोने पिकअपला समोरून धडक देऊन दोन जणांना जखमी केल्यानंतर चालक वाहन घटनास्थळी सोडून फरार झाला. तर सहजपूर फाट्याजवळ झालेल्या दुसऱ्या भीषण अपघातात कुंजीरवाडीत वास्तव्यास असलेल्या १९ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. या दोन्ही प्रकरणी यवत पोलिसांनी स्वतंत्र गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.

पहिल्या घटनेत काझड (ता. इंदापूर) येथील रोहित भारत म्हेत्रे (वय २८) यांनी यवत पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ते बारामती महावितरणचे खासगी कंत्राटदार असून, मित्र अक्षय झगडे यांच्या मालकीच्या महिंद्रा पिकअप (एमएच-४२ बीयू-१६५१) मधून कामगार जीवन वाढवे याच्यासह देलवडी येथे कामासाठी जात होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास पारगाव येथील २२ फाटा परिसरात राजस्थान ढाब्यासमोर समोरून आलेल्या एचआर-६३ जी-१८२१ क्रमांकाच्या आयशर टेम्पोने भरधाव वेगात येत पिकअपला जोरदार धडक दिली. या अपघातात रोहित म्हेत्रे व जीवन वाढवे हे किरकोळ जखमी झाले, तर दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे, अपघातानंतर आयशरचा चालक वाहन घटनास्थळी सोडून फरार झाला. याप्रकरणी अज्ञात चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, दुसऱ्या आणि अधिक भीषण अपघातात बोरीबेल (ता. दौंड) येथील यश दत्तात्रय पोटे (वय १९) या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत त्याचा भाऊ आदित्य दत्तात्रय पोटे यांनी यवत पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. यश पोटे हा गेल्या काही महिन्यांपासून कुंजीरवाडी येथे आपल्या चुलत्याकडे राहत होता. ८ जुलै रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास तो हिरो स्प्लेंडर दुचाकीवरून पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने जात असताना सहजपूर फाट्याजवळ समोरून येणाऱ्या एमएच-४३ बीएक्स-६९०४ क्रमांकाच्या आयशर वाहनाने अचानक लेन बदलत राँग साईडने येऊन त्याच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली.

धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की, यश पोटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना यवत ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या प्रकरणी आयशर चालक श्रीशैल सिद्रामय्या स्वामी (रा. रबाळे, नवी मुंबई) याच्याविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौफुला-न्हावरा मार्गावर वाढते अपघात चिंतेचा विषय
चौफुला-न्हावरा मार्गावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. भरधाव वेग, लेनचे उल्लंघन आणि वाहतुकीच्या नियमांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे या मार्गावर सातत्याने गंभीर अपघात होत आहेत. वारंवार होणाऱ्या या दुर्घटनांमुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण असून, या मार्गावर वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.







