पुणे: मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. येत्या २९ ऑगस्टपासून ते आमरण उपोषणाला बसणार असून, हे आंदोलन अंतरवाली सराटी येथेच करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, उपोषण सुरू असतानाही सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर मुंबईकडे रवाना होण्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून जरांगे पाटील यांचे आगामी उपोषण मुंबईत होणार की अंतरवाली सराटीत, याबाबत चर्चा सुरू होती. अखेर त्यांनी स्वतःच याबाबतची भूमिका स्पष्ट केली. २९ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीत उपोषण सुरू करण्यात येईल. त्यानंतरही मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही, तर आंदोलन सुरू असतानाच मुंबईला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत जाण्यासाठी आवश्यक परवानगीचा अर्ज करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही जोरदार टीका केली. सरकारमधील नेत्यांच्या भूमिकेमुळेच पुन्हा उपोषण करण्याची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच संजय सिरसाट यांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

सिरसाट यांच्या भूमिकेमुळे शिंदे यांना अडचण निर्माण होणार असल्याचे सांगतानाच, एकनाथ शिंदे आणि संजय सिरसाट यांच्यात संगनमत असल्याचा संशयही जरांगे यांनी व्यक्त केला. सिरसाट यांनी प्रमाणपत्र रद्द केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, अशी मागणी करत जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. त्यामुळे २९ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारची भूमिका काय राहणार, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.






