लोणी काळभोर, ता. ४ : कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक ७६० मधील शेतात दररोज मद्यपी तरुणांचा अड्डा रंगत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दारू पिऊन धिंगाणा घालणे, रिकाम्या बाटल्या शेतात फेकणे आणि पिकांचे नुकसान करणे यामुळे शेतकरी हैराण झाले असून पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

संग्राम सुरेश कदम आणि मयूर सुरेश कदम या शेतकरी बंधूंच्या मालकीच्या शेतात काही तरुण नियमितपणे येऊन मद्यपान करत असल्याचा आरोप आहे. शेत परिसरात मोठ्या प्रमाणात रिकाम्या दारूच्या बाटल्या, प्लास्टिक कचरा आणि इतर साहित्य पडलेले दिसून येत असून त्यामुळे शेताचे विद्रूपीकरण झाले आहे.

कदम बंधूंनी सांगितले की, अनेक वेळा संबंधित तरुणांना समज देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. उलट काही जणांकडून शेत परिसरात मोठ्या आवाजात गोंधळ घालण्याचे प्रकार सुरूच आहेत. यामुळे परिसरातील कुटुंबीयांनाही त्रास सहन करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, तरुणांचा धिंगाणा सुरू असल्याची माहिती मिळताच कदम बंधूंनी अनेकदा पोलिसांना फोन करून बोलावले. मात्र, पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच संबंधित तरुण पसार होत असल्याने त्यांच्यावर कारवाई होऊ शकलेली नाही. सध्या कदम बंधूंनी कामगारांच्या मदतीने शेतातील शेकडो रिकाम्या दारूच्या बाटल्या गोळा करून परिसर स्वच्छ केला आहे. मात्र, दररोज सुरू असलेल्या या प्रकारामुळे ते त्रस्त झाले असून शेतीचे संरक्षण करणे अवघड बनल्याचे त्यांनी सांगितले.
कडक कारवाईची मागणी
“शेत हे अन्न उत्पादनाचे ठिकाण आहे, दारू पिण्याचा अड्डा नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत कदम बंधूंनी पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायतीने संयुक्तपणे कारवाई करून या प्रकाराला आळा घालावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा हा प्रकार अधिक गंभीर स्वरूप धारण करण्याची भीती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.







