न्हावरे : चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या कामात प्रशासनाने चुकीचा प्राधान्यक्रम अवलंबल्याचा गंभीर आरोप शेतकरी कृती समितीने केला असून, हेडकडील सर्वाधिक पाणी गळती होणाऱ्या भागाकडे दुर्लक्ष करून टेलकडील भागात अस्तरीकरण सुरू केल्याने शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा अपेक्षित लाभ होत नसल्याचा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. मुख्य गळतीच्या भागाला तातडीने प्राधान्य न दिल्यास हजारो शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

चासकमान धरणापासून १ ते ७२ किलोमीटर या कालव्याच्या सुरुवातीच्या भागात सुमारे ७० टक्के पाण्याची गळती होत आहे. धरणातून सोडण्यात येणारे ६०० क्युसेक पाणी शिरूर तालुक्यातील मुखईपर्यंत पोहोचेपर्यंत केवळ १८० क्युसेक उरते, म्हणजेच तब्बल ४२० क्युसेक पाणी गळतीमुळे वाया जाते. एवढ्या मोठ्या प्रमाणात गळती असतानाही हेडकडील या मुख्य भागाच्या अस्तरीकरणासाठी अद्याप टेंडरही काढण्यात आलेले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे.

याउलट कालव्याच्या १२१ ते १४४ किलोमीटर या टेलकडील भागात घाईघाईने अस्तरीकरणाची कामे सुरू करण्यात आली आहेत. कालव्याचे अस्तरीकरण हे तांत्रिकदृष्ट्या ‘हेड-टू-टेल’ पद्धतीने होणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष करून उलट क्रमाने कामे सुरू असल्याने पाणी बचतीचा मूळ उद्देशच धोक्यात आल्याची टीका शेतकऱ्यांनी केली आहे.
याशिवाय कालव्याच्या ७३ ते १२० किलोमीटर या भागातील अस्तरीकरणाला प्रशासकीय मान्यता मिळूनही प्रत्यक्ष काम बंद असल्याचा आरोप करण्यात आला आहे.प्रशासनाने १९ जून २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकातील दावे आणि प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये मोठी तफावत असल्याचा दावा करत, केवळ कागदी कार्यवाही करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याची टीका शेतकरी कृती समितीने केली आहे.
दरम्यान, शेतकरी कृती समितीने चासकमान डाव्या कालव्याची हेड-टू-टेल प्रत्यक्ष पाहणी करून पाणी गळतीचा सविस्तर अभ्यास केला होता. या पाहणीनंतर तयार करण्यात आलेल्या अहवालात सुरुवातीच्या भागातच सर्वाधिक गळती होत असल्याचे नमूद करून तो अहवाल संबंधित अधिकारी आणि प्रशासनाकडे सादर करण्यात आला होता. मात्र, अहवालाकडे दुर्लक्ष करून टेलकडील भागातच अस्तरीकरण सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
शेतकरी कृती समितीचे सदस्य तात्यासाहेब सोनवणे,सागर खंडागळे,आशितोष बेंद्रे, बाळासाहेब बेंद्रे आणि विशाल झेंडे यांनी सांगितले की, शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके व जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने वास्तव परिस्थितीची पाहणी करून ज्या भागात सर्वाधिक गळती होत आहे, त्या भागाच्या अस्तरीकरणाला प्रथम प्राधान्य द्यावे. अन्यथा हजारो शेतकऱ्यांच्या सहभागातून तीव्र जन आंदोलन उभारले जाईल. असा इशारा शेतकरी कृती समितीने दिला आहे.
“चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम ‘हेड-टू-टेल’ पद्धतीनेच व्हावे. यासंदर्भात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन जलसंपदा मंत्र्यांना देण्यात आले आहे.”
– सुभाष कांडगे (सदस्य, महाराष्ट्र प्रदेश भाजपा किसान मोर्चा)“शासन निर्णयानुसार चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम सुरू आहे.”
– अजय वाघमोडे (उपअभियंता, चासकमान, शिक्रापूर)






