उरुळी कांचन (पुणे) : नायगाव व प्रयागधाम यांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पूल खचल्यामुळे निर्माण झालेल्या समस्येची दखल घेत हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे आणि पंचायत समिती सदस्य कृषिराज चौधरी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पुलाची व रस्त्याची पाहणी केली. नागरिकांचे होत असलेले हाल लक्षात घेता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अधिकाऱ्यांना तातडीने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेऊन रस्ता पूर्ववत सुरू करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. यावेळी अमोल चौधरी, अविनाश चौधरी, सागर व्यवहारे आदि उपस्थित होते.

नायगाव आणि प्रयागधाम परिसराला जोडणारा हा रस्ता आणि पूल दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत हा पूल खचल्यामुळे नागरिकांच्या व वाहनधारकांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला होता. हा मुख्य मार्ग बंद झाल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ, शाळकरी मुले, आणि विशेषतः शेतकऱ्यांना शेतीमाल वाहून नेण्यासाठी मोठा वळसा घालावा लागत असून त्यांचे प्रचंड हाल होत आहेत.

या समस्येची तीव्रता ओळखून हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे आणि पंचायत समिती सदस्य कृषिराज चौधरी यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांसह घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी पुलाची झालेली दुरवस्था आणि खचलेल्या भागाची त्यांनी बारकाईने पाहणी केली. रस्ता बंद असल्यामुळे स्थानिक नागरिकांना आणि वाहनधारकांना दैनंदिन प्रवासात कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, हे त्यांनी स्वतः ग्रामस्थांशी संवाद साधून समजून घेतले.
पुलाचे महत्त्व लक्षात घेता याचे काम विनाविलंब आणि दर्जेदार होणे गरजेचे आहे. यासाठी सभापती युवराज काकडे व कृषिराज चौधरी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ संपर्क साधला. आवश्यक ती सर्व प्रशासकीय कार्यवाही तातडीने पूर्ण करून, पुलाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करावे आणि रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत खुला करावा,” अशा सूचना कृषिराज चौधरी यांनी दिल्या.
दरम्यान, नागरिकांच्या सुरक्षित प्रवासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” अशी ग्वाही पंचायत समिती सदस्य कृषिराज चौधरी यांनी यावेळी स्थानिक ग्रामस्थांना दिली.






