बारामती: भंडारा जिल्ह्यातील एका सामान्य शेतकरी पुत्राने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर जग जिंकले असून, सध्या संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचीच चर्चा आहे. प्रशांत मिश्रा असे या तरुणाचे नाव असून त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयच्या मदतीने शेतीचे रूप पालटून टाकले आहे. मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला आणि टेस्लाचे प्रमुख एलोन मस्क यांसारख्या जागतिक दिग्गजांनी सोशल मीडियावरून प्रशांत यांच्या प्रयोगाचे जाहीर कौतुक केले आहे. एका मराठी उद्योजकाने कृषी क्षेत्रात लावलेल्या या शोधामुळे भारताचे नाव जगभर अभिमानाने घेतले जात आहे.

जागतिक स्तरावरील कौतुकामागे बारामतीमध्ये (Baramati News) झालेला एक अभूतपूर्व प्रयोग कारणीभूत आहे. प्रशांत यांच्या अॅग्रीपायलट या कंपनीने तयार केलेल्या विशेष तंत्रज्ञानाचा वापर करून बारामती येथील शेतकऱ्यांनी चक्क 22 फूट उंचीचा ऊस पिकवून दाखवला आहे. एरवी ऊस जास्तीत जास्त 10 ते 12 फूट वाढतो, परंतु एआयच्या साहाय्याने पाण्याचे अचूक नियोजन आणि खतांचे योग्य व्यवस्थापन केल्याने ही किमया साधली गेली. सत्या नाडेला यांनी आधुनिक विज्ञानामुळे शेतीमध्ये कशी प्रगती होऊ शकते असे सांगत व्हिडीओ शेयर केला आहे.
प्रशांत मिश्रा यांनी नागपूरच्या आयटी क्षेत्रातून सुरुवात केल्यानंतर त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग शेतीत करण्यासाठी करण्याचे ठरवले. यातूनच त्यांनी अॅग्रीटेक क्षेत्रातील आपली स्वतंत्र कंपनी स्थापन केली, जिचे तंत्रज्ञान आज अनेक देशांतील शेतकरी वापरत आहेत. रासायनिक खतांचा अतिवापर टाळून आणि पाण्याचे थेंब न थेंब वाचवून पीक कसे वाढवायचे, याचे सोपे तंत्र त्यांनी विकसित केले आहे. यामुळे शेतकऱ्यांची केवळ मजुरीच वाचत नाही, तर त्यांचे उत्पन्नही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. एका मराठी माणसाने शेती आणि तंत्रज्ञान यांची अशी सांगड घातली आहे की, त्यामुळे भविष्यातील शेतीचे चित्रच बदलणार आहे.







