उरुळी कांचन, (पुणे) : भरधाव आणि ओव्हरलोड मुरूम वाहून नेणाऱ्या डंपर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे डाळिंब (ता. दौंड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेततील सरंक्षक भिंतीला जोरदार धडक दिल्याने शाळेच्या आवारात घुसला.

मंगळवारी (ता. 23) दुपारी घडलेल्या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेमुळे डाळिंब गावामध्ये प्रचंड भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या भीषण अपघातात शाळेच्या मालमत्तेचे नुकसान झाले असून, सुदैवाने एका मोठ्या आणि भयानक दुर्घटनेतून निष्पाप शाळकरी मुले बालंबाल बचावली आहेत.

स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डाळिंब गावच्या हद्दीतून मुरूम भरून एक हायवा डंपर अत्यंत बेफाम आणि सुसाट वेगाने चालला होता. डाळिंब गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या जवळ येताच, पावसामुळे व त्यांना ठरवून दिलेल्या ट्रिपायामुळे हायवा चालक सुसाट डंपर पळवतात. यामुळे या ठिकाणी हायवा चालकाचे गाडीवरील नियंत्रण पूर्णपणे सुटले.
नियंत्रण सुटलेला हा हायवा थेट शाळेच्या दिशेने झेपावला. अत्यंत वेगात असलेल्या या डंपरने जिल्हा परिषद शाळेची पक्की वीट-सिमेंटची भिंत क्षणात चक्काचूर केली आणि थेट आतमध्ये घुसला. डंपरच्या धडकेमुळे मोठा आवाज झाला, ज्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी आणि शिक्षकांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली.
दरम्यान, अपघात घडला त्या वेळी सुदैवाने मुले वर्गात होती किंवा मैदानावरील डंपर घुसलेल्या जागेपासून दूर होती, ज्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. जर हा अपघात मधल्या सुट्टीत किंवा मुले बाहेर खेळत असताना घडला असता तर मोठी दुर्घटनेला सामोरे जावे लागले असते.
दौंडसह हवेली तालुक्यातील ‘हायवाची’ मुजोरी कधी थांबणार?
उरुळी कांचन, कुंजीरवाडी, यवत आणि डाळिंब परिसरात सध्या बेकायदेशीर खडी, माती आणि मुरूम वाहून नेणाऱ्या हायवा आणि डंपर चालकांनी महामार्गावर आणि ग्रामीण रस्त्यांवर कडक धुमाकूळ घातला आहे. “या अवजड वाहनांना गजबजलेल्या गावांतून जाताना वेगाचे कोणतेही कडक नियम लागू नाहीत का? आरटीओ (RTO) आणि स्थानिक पोलीस या ओव्हरलोड वाहनांकडून फक्त वसुली करतात का?” असा थेट आणि आक्रमक सवाल डाळिंब ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.






