पुणे : अमरावतीच्या मेळघाट परिसरातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.धारणी तालुक्यातील टीटंबा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. रात्रीचे जेवण झाल्यानंतर अचानक 70 विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ आणि चक्कर येण्याचा त्रास होऊ लागला. विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडत असल्याचे लक्षात येताच शाळा व्यवस्थापनाने तातडीने हालचाली करत सर्वांना उपचारासाठी धारणीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी आणि आरोग्य यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयात पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. खबरदारी म्हणून आश्रमशाळेच्या परिसरातही वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले असून तिथे आवश्यक औषधसाठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या सर्व विद्यार्थ्यांवर योग्य ते वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. कोणाच्याही जीवाला धोका नाही. दरम्यान, विषबाधा नेमकी कशामुळे झाली हे शोधण्यासाठी विद्यार्थ्यांनी खाल्लेल्या अन्नाचे आणि पिण्याच्या पाण्याचे नमुने गोळा करून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
या अचानक घडलेल्या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आश्रमशाळा प्रशासनाच्या या निष्काळजीपणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी आता पालकांकडून केली जात आहे.






