लोणी काळभोर, ता. 25 : लोणी काळभोर जिल्हा परिषद गट व पंचायत समिती निवडणुकीत पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या निर्णयांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, तिकीट कापलेल्या व डावललेल्या उमेदवारांचा संताप आता उघड बंडखोरीत रूपांतरित होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप या प्रमुख पक्षांमध्ये अंतर्गत नाराजी उफाळून येत असून, याचा थेट परिणाम निवडणुकीच्या निकालावर होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
लोणी काळभोर जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी अनिता गवळी, सिंपल कांबळे व शीतल कांबळे हे तीन दावेदार रिंगणात होते. मात्र, पक्षश्रेष्ठींनी अनिता गवळी व सिंपल कांबळे यांचे तिकीट कापत शीतल कांबळे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली. या निर्णयामुळे राष्ट्रवादीत मोठी खळबळ उडाली. तिकीट न मिळाल्याने संतप्त झालेल्या सिंपल कांबळे यांनी तात्काळ शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करत उमेदवारी मिळवली, तर अनिता गवळी यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा ठाम निर्णय घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात फूट पडल्याचे उघडपणे दिसत असून, बंडखोर उमेदवारांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

या गटात भाजपकडून पूनम बाबुराव गायकवाड, शिवसेना (उबाठा) कडून कलावती अश्रुबा धेले, बसपाकडून नीता संजय आवारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर रुपाली अविनाश कोरे, अनिता सुर्यकांत गवळी, स्वाती गणेश थोरात यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने लढत बहुरंगी व अत्यंत चुरशीची झाली आहे.
दरम्यान, लोणी काळभोर-कदमवाकवस्ती पंचायत समिती गणातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णयामुळे नाराजीचा भडका उडाला आहे. या गणात राहुल जोगदंड, अमोल टेकाळे, अक्षय म्हस्के, प्रकाश भिसे व विजय दाभाडे इच्छुक असताना, पक्षाने अमोल टेकाळे यांना उमेदवारी दिली. परिणामी भारत मोहन पिसाळ, नितेश अंबादास लोखंडे यांच्यासह इतर इच्छुकांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरायचा निर्धार केल्याने राष्ट्रवादीच्या गोटात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भाजपमध्येही अशीच स्थिती असून, कदमवाकवस्ती पंचायत समिती गणात ज्ञानेश्वर नामुगडे यांना उमेदवारी दिल्याने नकुल शिंदे व राकेश लोंढे हे नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. लोणी काळभोर पंचायत समिती गणात भाजपच्या श्वेता काळभोर व राष्ट्रवादीच्या रेश्मा काळभोर यांच्यात थेट लढत होत असली तरी, शिवसेनेच्या नंदिनी कोळपे व अपक्ष विद्या दत्तात्रय गायकवाड यांच्यामुळे समीकरणे बिघडण्याची शक्यता आहे.
नाराजांची भूमिका महत्त्वाची ठरणार?
पक्षांतर्गत कलह, तिकीट कापण्याचे राजकारण आणि नेतृत्वाचा अभाव यामुळे मतदार संभ्रमात असून, याचा थेट फायदा अपक्ष उमेदवारांना होण्याची दाट शक्यता आहे. योग्य नेतृत्व न मिळाल्यास विकासाच्या समस्या सुटणार कशा, असा सवाल नागरिक विचारत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत पक्षांपेक्षा नाराज व बंडखोर उमेदवारच बाजी मारणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
योग्य नेतृत्वाचा अभाव; समस्यांचा डोंगर सुटणार तरी कसा?
लोणी काळभोर जिल्हा परिषद गट व पंचायत समिती परिसरात पाणीटंचाई, वाहतूक कोंडी, आरोग्य सुविधा, वीजपुरवठा, अंतर्गत रस्ते, कचरा व्यवस्थापन अशा मूलभूत समस्यांचा डोंगर उभा आहे. मात्र निवडणूक जवळ येऊनही या प्रश्नांवर ठोस भूमिका मांडणारे, जनतेशी थेट संवाद साधणारे सक्षम नेतृत्व अद्याप दिसून येत नाही. पक्षांतर्गत गटबाजी, तिकीट वाटपातील राजकारण व वैयक्तिक कुरघोडी यामध्येच बहुतांश नेते अडकले असल्याने विकासाचे प्रश्न दुय्यम ठरत असल्याची भावना मतदारांमध्ये निर्माण झाली आहे.
अपक्षांना बाजी मारण्याची संधी
पक्षीय राजकारणातून वैतागलेल्या मतदारांचा कल आता स्वच्छ प्रतिमा, स्थानिक प्रश्नांची जाण आणि थेट संपर्क असलेल्या उमेदवारांकडे वळताना दिसत आहे. त्यामुळे नाराज कार्यकर्ते, बंडखोर नेते व स्थानिक पातळीवर प्रभाव असलेले अपक्ष उमेदवार यांना यंदाच्या निवडणुकीत मोठी संधी मिळू शकते. जर पक्षांनी अंतर्गत मतभेद आवरले नाहीत, तर मतं विभागले जाऊन अपक्ष उमेदवारच निकालाची दिशा ठरवतील, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.







