पुणे: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. मात्र, आता हा केवळ अपघात नसून तो एक ‘नियोजित घातपात’ असू शकतो, असा खळबळजनक दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी थेट पुराव्यांच्या आधारे अनेक तांत्रिक प्रश्न उपस्थित करत तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे केले. “अजितदादांचा 100 टक्के घातपात करण्याचा प्रयत्न झाला असावा,” असा गंभीर संशय त्यांनी व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळजनक उडाली आहे.

रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या दाव्यांमधील प्रमुख मुद्दा म्हणजे पायलटची अचानक झालेली बदल आणि त्यांनी दिलेली कारणे. मूळ नियोजित पायलट ट्राफिकमध्ये अडकल्याचे सांगण्यात आले, पण पहाटे 6:30 वाजता एवढे ट्रॅफिक कुठे होते? असा सवाल त्यांनी केला. विशेष म्हणजे, एक पायलट अडकला असताना दोन्ही पायलट का बदलले? आणि आंतरराष्ट्रीय फ्लाईटवरून नुकत्याच आलेल्या मुख्य पायलटला ऐनवेळी का पाठवण्यात आले? या प्रश्नांनी या प्रकरणाचे गूढ वाढवले आहे.
विमान प्रवासात एक सेकंदाची किंमत ही मृत्यू असते. रोहित पवारांच्या दाव्यानुसार, केंद्रीय विमान मंत्रालयाचा अहवाल आणि ‘एटीसी ट्रान्स्क्रिप्ट’ (ATC Transcript) यांच्या वेळेत मोठी तफावत आहे. अहवालानुसार संपर्क 8:18 ला झाला, तर एटीसी 8:19 ही वेळ सांगते. या एका मिनिटाच्या फरकाकडे त्यांनी संशयाने पाहिले आहे. तसेच, विमान कोसळण्यापूर्वी एक मिनिट आधीच ‘फ्लाइट रडार’चा डेटा का बंद झाला? ट्रान्सपॉन्डर्स मुद्दाम बंद केले गेले होते का, याची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
अपघाताच्या वेळी बारामती विमानतळावर दृश्यमानता केवळ 4 किलोमीटर असतानाही विमान उतरवण्याचा प्रयत्न का झाला? तसेच, सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ‘रनवे 29’ ऐवजी ‘रनवे 11’ वर उतरण्याचा आग्रह पायलट का धरत होता? रोहित पवारांच्या मते, जर विमान रनवे 29 वर उतरले असते, तर दादा सुरक्षित राहिले असते.
सर्वात थरकाप उडवणारा दावा म्हणजे शेवटच्या क्षणांमधील पायलटचे वर्तन. को-पायलट शांभवी पाठक शेवटच्या क्षणी ओरडताना ऐकू येतात, मात्र मुख्य पायलट शेवटच्या 3-4 मिनिटांत एक शब्दही बोलला नाही. मृत्यू समोर दिसत असतानाही मुख्य पायलटचे हे ‘गूढ मौन’ सर्वात मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करते.
हा केवळ एका नेत्याच्या अपघाताचा प्रश्न नाही, तर राज्याच्या सुरक्षा यंत्रणेवरचा विश्वास आहे. रोहित पवारांनी उपस्थित केलेले तांत्रिक मुद्दे जसे की ‘Aiming Point’ च्या आधीच विमान खाली आणणे आणि रडार सिग्नल तुटणे, हे सर्व तज्ञांच्या मते गंभीर आहेत. या आरोपांमुळे आता केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालय आणि राज्य तपास यंत्रणांना या प्रकरणाचा फेरतपास करावा लागण्याची शक्यता आहे.







