झारखंड: झारखंडमधील बोकारो जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 18 वर्षीय विद्यार्थिनी पुष्पा महतो हिची हत्या झाल्याचे उघड झाले असून, तब्बल 8 महिन्यांनंतर जंगलात तिचा सांगाडा सापडला आहे. या प्रकरणात तपासात हलगर्जीपणा आणि आरोपीला संरक्षण दिल्याचा आरोप होत असल्याने मोठी कारवाई करण्यात आली आहे.

पुष्पा 21 जुलै 2025 रोजी कॉलेजला जात असल्याचे सांगून घरातून निघाली होती, मात्र ती परतलीच नाही. तिच्या कुटुंबीयांनी तातडीने तक्रार करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी सुरुवातीला दखल घेतली नाही. 13 दिवसांनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पुष्पाच्या कुटुंबीयांनी शेजारी राहणाऱ्या दिनेश महतोवर सुरुवातीपासून संशय व्यक्त केला होता. मात्र, पोलिसांनी त्याला क्लिन चिट दिल्याचा आरोप आहे. तपासात धक्कादायक बाब समोर आली की, आरोपी आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांनी एकत्र पार्टी केली होती. आरोपीने 23 सिम कार्ड आणि 4 मोबाईल वापरून पोलिसांची दिशाभूल केली होती.
प्रकरण गंभीर झाल्यानंतर झारखंड उच्च न्यायालय ने हस्तक्षेप केला. न्यायालयाने पोलिसांना फटकारल्यानंतर नव्या एसआयटीची स्थापना करण्यात आली. तदाशा मिश्रा यांच्या आदेशानंतर एसआयटीने 11 एप्रिल रोजी आरोपी दिनेश महतोला अटक केली. त्याच दिवशी जंगलातून पुष्पाचा सांगाडा आणि हत्येसाठी वापरलेला चाकू जप्त करण्यात आला.
या प्रकरणात जुन्या तपास पथकाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे समोर आल्याने पोलीस अधीक्षक हरविंदर सिंह यांनी कठोर कारवाई करत 28 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. यामध्ये 10 सब-इन्स्पेक्टर, 5 असिस्टंट सब-इन्स्पेक्टर, 2 हवालदार आणि 11 शिपाई यांचा समावेश आहे.
या घटनेमुळे महतो कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. योग्य वेळी कारवाई झाली असती तर मुलगी वाचली असती, अशी भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.







