पुणे: ऐन उन्हाळ्यात पुणे शहरातील खासगी वॉटर टँकर व्यावसायिकांनी आजपासून अनिश्चित काळासाठी संप पुकारला आहे. या निर्णयामुळे शहरात पाणीटंचाईची शक्यता निर्माण झाली असून नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.

टँकर चालक आणि मालकांनी ‘टँकर माफिया’ हा आरोप ठामपणे फेटाळून लावत आपण सेवा देणारे आहोत, असा स्पष्ट संदेश दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या परिस्थितीत टँकर व्यवसाय तोट्यात चालत असून प्रत्येक ट्रिपमागे फक्त 500 ते 600 रुपये नफा उरतो. त्यात नव्या नियमांनुसार प्रत्येक टँकरसोबत हेल्पर ठेवणे बंधनकारक करण्यात आले असून त्यामुळे प्रति ट्रिप सुमारे 1500 रुपयांचा अतिरिक्त खर्च वाढत आहे. त्यामुळे खिशातून पैसे घालून सेवा देणे परवडत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय आरटीओकडून गेल्या 2 महिन्यांपासून टँकर वाहनांचे पासिंग बंद असल्याची तक्रारही करण्यात आली आहे. सर्व कागदपत्रे पूर्ण असतानाही वाहनांना परवानगी दिली जात नसल्याचा आरोप करण्यात आला. ट्रॅफिक पोलिसांकडून टँकर जप्त करण्याच्या कारवाईमुळे व्यावसायिकांमध्ये असंतोष वाढला आहे.
पाणीपुरवठ्याच्या मुद्द्यावरही व्यावसायिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पुण्यासाठी 14 टीएमसी पाणी मंजूर असताना प्रत्यक्ष वापर 22 टीएमसीपर्यंत होत असल्याचा दावा करण्यात आला. नव्या सोसायट्यांमध्ये शाश्वत पाणीपुरवठा व्यवस्था नसल्याने नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
कोविड काळातही अखंड सेवा दिल्याची आठवण करून देत प्रत्येक अपघातासाठी चालकांनाच जबाबदार धरले जाते, यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, या संपामुळे शहरातील अनेक भागांत पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता असून प्रशासन आणि टँकर संघटना यांच्यात लवकर तोडगा निघतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







