लोणी काळभोर, ता. 23 : पांडेश्वर (ता. पुरंदर) येथील रोमणवाडी परिसरात एका घराच्या दरवाजासमोर कथित भानामती व जादूटोण्याच्या उद्देशाने अघोरी पूजा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नारळाला काळी बाहुली बांधणे, सुमारे 20 लिंबांना लोखंडी टाचण्या टोचणे, हळद-कुंकू, बुक्का तसेच अर्धवट कापलेले लिंबू व कवळ ठेवण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी रोहीदास दिनकर जाधव (वय 70, रा. रोमणवाडी, पांडेश्वर) यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार निलम हनुमंत मगर, अक्षय ऊर्फ बंटी हनुमंत मगर (जोगता) आणि दोन अनोळखी महिला (सर्व रा. लोणी काळभोर, ता. हवेली) यांच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 – 3(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव हे 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी कामावरून घरी परतल्यानंतर घराच्या दरवाजाजवळ लाल रंगाचे कापड टाकून त्यावर नारळ, काळी बाहुली, टाचण्या टोचलेली लिंबे, हळद-कुंकू आणि इतर साहित्य आढळले. घरातील वृद्ध तुळसाबाई यांनी सांगितले कि, सायंकाळच्या सुमारास संबंधित महिला व इतर व्यक्ती घरासमोर काहीतरी पूजा करत असल्याचे दिसले.

प्रकार लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती देण्यासाठी 112 क्रमांकावर फोन केला. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कुटुंबीयांनी चर्चा करून जेजुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, घरासमोर अशा प्रकारे अघोरी पूजा करून जादूटोणा केल्याचा आरोप झाल्याने पोलिस तपासाकडे आता लक्ष लागले आहे. या प्रकारामागील नेमका उद्देश काय होता, तसेच तक्रारीतील व्यक्तींचा त्यात सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.







