ऋषभ परदेशी

राशीन: राशीन ग्रामपंचायतीच्या गट क्रमांक १४७६ आणि १४७७ मधील अतिक्रमित जागेचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. भूमी अभिलेख विभागाने बुधवारी (ता. १२) या जागेची हद्द कायम करून अधिकृत हद्दीच्या खुणा निश्चित केल्या. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेवरील अतिक्रमणाबाबत योगेंद्र सांगळे यांनी मुख्यमंत्री सचिवालय कक्षाकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रारीची गंभीर दखल घेत अहमदनगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी २२ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या बैठकीत संबंधित जागेची तातडीने मोजणी करून अतिक्रमण निश्चित करण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार भूमी अभिलेख विभागाकडून १० जुलै २०२६ रोजी जागेची मोजणी पूर्ण करण्यात आली. त्यानंतर बुधवारी (ता. १२) भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी फिरोज पठाण, रोहित चतुर, सुनील धामणे, प्रवीण गायकवाड आणि पंकज निमसे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून हद्द कायमची प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी रोहिदास कापरे, कर्मचारी दया आढाव, विनोद आढाव यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.
अखेर जागेची अधिकृत हद्द निश्चित
मोजणी आणि हद्द कायमच्या प्रक्रियेमुळे गट क्रमांक १४७६ व १४७७ मधील ग्रामपंचायतीच्या जागेची अधिकृत हद्द स्पष्ट झाली आहे. त्यामुळे संबंधित जागेवर नेमके अतिक्रमण कुठे आणि किती आहे, हे निश्चित करण्यासाठी महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री सचिवालयातील तक्रारीपासून सुरू झालेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, आता ग्रामपंचायतीच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासनाकडून पुढील कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.







