पुणे: पुणे-नाशिक महामार्गावरील मंचर परिसरात घडलेल्या एका अमानवीय घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. रविवारी सायंकाळी ५:३० च्या सुमारास एका माथेफिरू तरुणाने २० वर्षीय तरुणीला बळजबरीने धरणाच्या कालव्यात ढकलून दिल्याने खळबळ उडाली आहे. या दुर्दैवी घटनेत पीडित तरुणी वाहून गेली असून तिचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नाली पोपट भांगरे (वय २०) ही तरुणी कामावरून घरी परतत असताना रमेश कडाळे या आरोपीने तिला अचानक अडवले. त्याने कोणतीही पूर्वकल्पना न देता स्वप्नालीला रस्त्यावरून ओढत नेले आणि कालव्याच्या पुलावरून थेट पाण्याच्या वेगवान प्रवाहात फेकून दिले. धक्कादायक म्हणजे, त्यानंतर त्याने स्वतःही कालव्यात उडी मारली.

हा प्रकार पाहताच स्थानिक सरपंच नवनाथ निघोट यांनी अन्य तरुणांना तातडीने मदतीसाठी बोलावले असता. कुणाल निघोट, रोहित निघोट आणि समीर निघोट या तरुणांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून पाण्यात उडी घेतली आणि आरोपी रमेश याला सुखरूप बाहेर काढले. मात्र, क्रूरतेची सीमा गाठलेल्या या तरुणाने वाचवणाऱ्यांवरच दगडफेक केली. अखेर स्थानिक नागरिकांनी त्याला पकडून मंचर पोलिसांच्या हवाली केले.
दुर्दैवाने, कालव्याचा वेगवान प्रवाह जास्त असल्याने स्वप्नालीचा शोध घेताना मोठ्या अडचणी येत आहेत. रात्री उशिरापर्यंत स्थानिक तरुण आणि ड्रोनच्या मदतीने शोधमोहीम राबवण्यात आली, परंतु अद्याप तिचा पत्ता लागलेला नाही. या माथेफिरू तरुणाने असे भीषण कृत्य का केले, याचा तपास पोलीस करत आहेत.







