पुणे : दिल्लीतील प्रसिद्ध जंतर-मंतरवर ‘नीट’ पेपरफुटीच्या विरोधात झालेल्या आंदोलनाला मोठा पाठींबा मिळाला होता.मुंबईतही शेकडो विद्यार्थी आणि तरुण रस्त्यावर उतरले. मुंबईतील निदर्शनादरम्यान परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला. तसेच, काही आंदोलक तरुणांवर गुन्हे देखील नोंदवण्यात आले होते.या आंदोलनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्र्यांनी पोलीस प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले आहेत की, आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल केलेले सर्व गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत. तरुणांचे शैक्षणिक आणि व्यावसायिक भविष्य खराब होऊ नये, या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे.त्यांच्या या निर्णयाचे विद्यार्थी संघटना आणि पालकांनी मनापासून स्वागत केले आहे.

मात्र, गुन्हे मागे घेतले तरी नीट पेपरफुटीतील खऱ्या दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि भविष्यात परीक्षा पद्धतीत पारदर्शकता आणण्यासाठी योग्य त्या सुधारणा कराव्यात, या आपल्या मूलभूत मागण्यांवर विद्यार्थी अजूनही ठाम आहेत.
नीट परीक्षा पेपरफुटीचे प्रकरण समोर आल्यानंतर संपूर्ण देशभरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या गैरप्रकाराविरोधात तरूणाईने एकत्र येत आक्रमक भूमिका घेतली. ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 36 दिवस हे आंदोलन चालवले गेले. या आंदोलनादरम्यान ‘जेन जी’ (Gen Z) तरुणांनी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासह तीन प्रमुख मागण्या सरकारसमोर ठेवल्या होत्या.






