खेड-शिवापूर : पुणे-सातारा महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने पुढे जाणाऱ्या तीन कारला पाठीमागून धडक दिल्याची घटना शनिवारी (दि. २९) सकाळी साडेअकराच्या सुमारास खेड-शिवापूर हद्दीत हॉटेल सागरजवळ घडली. या अपघातात तिन्ही कारचे नुकसान झाले असून, कंटेनर चालकाविरुद्ध राजगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निखील माणिक जाधव (वय ३३, व्यवसाय नोकरी, रा. भोसरी, पुणे) हे आपल्या कारने पुणे-सातारा महामार्गावरून साताऱ्याच्या दिशेने जात होते. सकाळी सुमारे ११:५० वाजण्याच्या सुमारास त्यांची कार खेड-शिवापूर गावच्या हद्दीत पुणे-सातारा महामार्गावरील सातारा बाजूकडे जाणाऱ्या लेनमध्ये हॉटेल सागरजवळ आली होती.

यावेळी राजस्थान येथील कंटेनर चालक मुब्बा खान (वय ४८, रा. मालाखेरा, जिल्हा अलवर, राजस्थान) हा आयशर कंपनीचा कंटेनर घेऊन त्याच मार्गाने साताऱ्याच्या दिशेने जात होता. चालकाने ताब्यातील कंटेनर भरधाव वेगाने तसेच वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून हयगयीने व अविचाराने चालविल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

दरम्यान, कंटेनरने फिर्यादी यांच्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे पुढे असलेल्या आणखी दोन कारलाही धडक बसली. त्यामुळे एकामागोमाग तीन वाहनांचा अपघात झाला. या अपघातात संबंधित तिन्ही कारचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.या घटनेनंतर फिर्यादी निखील जाधव यांनी राजगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी कंटेनर चालकाविरुद्ध कारवाई सुरू केली आहे.
अपघात नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, वाहनांचा वेग किती होता, तसेच अपघातामुळे झालेल्या नुकसानीची माहिती पोलिसांकडून तपासली जात आहे. महामार्गावर भरधाव वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढत असल्याने वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात येत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत असून, प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.






