न्हावरे : कोणतीही खाजगी शिकवणी न लावता खोलीवरच तब्बल १६ तास स्व-अभ्यास,जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आंबळे(ता. शिरूर)येथील ऋषिकेश बाळासाहेब बेंद्रे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत ४०० पैकी ३१० गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.विशेष म्हणजे, ऋषिकेश यांची उद्योग निरीक्षक तसेच दुय्यम निरीक्षक(राज्य उत्पादन शुल्क)या दोन्ही पदांसाठी निवड झाली असून,त्यांच्या या दुहेरी यशामुळे आंबळे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

ऋषिकेश बेंद्रे यांचे प्राथमिक शिक्षण आंबळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत,तर माध्यमिक शिक्षण न्हावरे येथील श्री.मल्लिकार्जुन विद्यालयात झाले. त्यानंतर शिरूर येथून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी पुणे गाठले.गुणवत्तेच्या जोरावर त्यांना पुणे विद्यार्थी गृह कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे प्रवेश मिळाला.चार वर्षांचा अभियांत्रिकी अभ्यासक्रम त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण करून इंजिनिअरची पदवी संपादन केली.

अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांच्यासमोर चांगल्या पॅकेजची नोकरी करण्याची संधी होती.मात्र,आकर्षक पगाराची नोकरी करण्यापेक्षा स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी व्हायचे आणि प्रशासनाच्या माध्यमातून तळागाळातील जनतेची सेवा करायची,असा निर्धार त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली.

पहिल्याच प्रयत्नात अपयश आले; मात्र त्यातून खचून न जाता ऋषिकेश यांनी आपली जिद्द कायम ठेवली.२०२१ पासून पुण्यात तसेच वेळोवेळी गावाकडे राहून त्यांनी दररोज सुमारे १६ तास स्व-अभ्यास केला.कोणतीही खाजगी शिकवणी न लावता स्वतःच्या अभ्यासावर आणि सातत्यावर विश्वास ठेवत त्यांनी अखेर झालेल्या २०२५ च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.
ऋषिकेश बेंद्रे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल आंबळे ग्रामस्थांच्या वतीने भव्य मिरवणूक काढून त्यांचा जाहीर सत्कार केला. त्यांच्या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या यशाचे श्रेय ऋषिकेश यांनी वडील बाळासाहेब बेंद्रे,आई माया बेंद्रे तसेच मार्गदर्शन करणारे शिक्षक यांना दिले आहे.खाजगी शिकवणी शिवाय स्व-अभ्यासातून मिळवलेले ऋषिकेश बेंद्रे यांचे हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरले आहे.
“भावी अधिकाऱ्यांनी स्वप्नांचा पाठलाग करावा”
“कोरोनानंतर स्पर्धा परीक्षांकडे विद्यार्थ्यांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे.त्यामुळे या क्षेत्रातील स्पर्धाही प्रचंड वाढली आहे.मात्र, नवोदित विद्यार्थ्यांनी केवळ रिल्स किंवा बातम्या पाहून अथवा आई-वडिलांच्या आग्रहाखातर स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात येऊ नये. आपल्याला खरोखरच या परीक्षेत यश मिळवायचे असेल,तर प्रथम पदवीचे शिक्षण पूर्ण करून त्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करावी.जिद्द, चिकाटी,सातत्य आणि योग्य नियोजनाच्या जोरावर निश्चितपणे यश मिळवता येते,” असा सल्ला ऋषिकेश बेंद्रे यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या नवोदित विद्यार्थ्यांना दिला.






