पुणे : धावपट्टी दुरुस्ती आणि पुनर्बांधणीच्या कामांसाठी पुणे विमानतळ काही दिवस बंद राहणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. भारतीय हवाई दलाच्या अखत्यारीतील पुणे विमानतळ बंद न करता सकाळी विमानतळावरील नियोजित दोन तासांच्या विश्रांतीच्या कालावधीतच धावपट्टीची आवश्यक देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे.

भारतीय हवाई दलाकडून उड्डाण सुरक्षितता आणि कार्यक्षमता कायम राखण्यासाठी वेळोवेळी धावपट्टीची डागडुजी आणि नूतनीकरणाची कामे केली जातात. यंदा जोधपूर, श्रीनगर, आदमपूर आणि पुणे या चार विमानतळांवर अशी कामे करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार जोधपूर विमानतळावरील काम मार्च आणि एप्रिल महिन्यात पूर्ण झाले आहे. श्रीनगर विमानतळ ऑगस्टमध्ये, तर आदमपूर विमानतळ नोव्हेंबरमध्ये काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र, पुणे विमानतळाबाबत वेगळा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी सांगितले की, पुणे विमानतळावरून दररोज सुमारे २०० विमानांची ये-जा होते. विमानतळ पूर्णपणे बंद केल्यास हजारो प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता होती. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने भारतीय हवाई दलाकडे सकाळी विमानतळ बंद असलेल्या दोन तासांच्या कालावधीतच दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याची विनंती केली होती. हवाई दलाने या प्रस्तावाला मान्यता दिली असून त्यानुसार कामे केली जाणार आहेत.
दरम्यान, पुणे विमानतळाच्या जुन्या टर्मिनल इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून सध्या सुरक्षा उपकरणे बसवण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर आवश्यक सुरक्षा तपासणी पूर्ण झाल्यानंतर हे टर्मिनल प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहितीही ढोके यांनी दिली.
विमानतळ परिसरातील वाहतूक व्यवस्थेबाबतही प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. आगमन प्रवेशद्वाराजवळ प्रवाशांना घेण्यासाठी आलेल्या वाहनांना १५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ थांबण्यास परवानगी नाही. मात्र अनेक वाहने नियम मोडून अर्धा तास किंवा त्याहून अधिक वेळ उभी राहत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा वाहनांवर ५०० रुपयांचा दंड आकारण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.
याशिवाय विमानांना ‘बर्ड हिट’चा धोका कमी करण्यासाठीही विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. धावपट्टी परिसरातील गवत कापून स्वच्छता करण्यात आली असून पक्ष्यांना धावपट्टीपासून दूर ठेवण्यासाठी आवश्यक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याचे संतोष ढोके यांनी स्पष्ट केले.







