पुणे : यंदा मान्सून लांबल्याने आणि धरणांतील पाणीसाठ्यावर ताण निर्माण झाल्याने पुणे महापालिकेने आज, सोमवारपासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय अमलात आणला आहे. सम-विषम तारखांनुसार पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले असून, पाणीकपातीच्या पहिल्याच दिवशी शहरातील अनेक भागांत पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुणे शहराला मुख्यत्वे खडकवासला धरणसाखळीमधून पाणीपुरवठा केला जातो. याशिवाय पूर्व पुण्यातील काही भागांना भामा-आसखेड धरणातूनही पाणी दिले जाते. मात्र, १५ जून उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून, त्याचा परिणाम जलसाठ्यांवरही होताना दिसत आहे.

राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांना उपलब्ध पाणीसाठा ऑगस्टपर्यंत पुरेल, अशा पद्धतीने नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांनाही घाईघाईने पेरण्या न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या पुणे महापालिका धरणांतून दररोज सुमारे १६०० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी उचलत आहे. नव्या नियोजनानुसार हा पुरवठा कमी करून सुमारे ११०० ते १२०० एमएलडीपर्यंत आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सम-विषम तारखांनुसार पाणीपुरवठ्याचे सविस्तर वेळापत्रक महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. भामा-आसखेड प्रकल्पातून पाणीपुरवठा होणाऱ्या उत्तर-पूर्व भागाला सध्या तांत्रिक कारणांमुळे या कपातीमधून वगळण्यात आले आहे.
पाणीटंचाईचा गैरफायदा घेऊन कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या किंवा नागरिकांची अडवणूक करणाऱ्या टँकरचालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
महापालिकेने नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले असून नळ, टाक्यांमधील गळती तातडीने दुरुस्त करणे, पाण्याच्या टाक्या ओव्हरफ्लो होणार नाहीत याची काळजी घेणे, तसेच अनधिकृत नळजोडांची माहिती प्रशासनाला देण्याचे आवाहन केले आहे. पाणीपुरवठ्याबाबतच्या तक्रारींसाठी १८००-१०३०-२२२ या कॉल सेंटर क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.
दरम्यान, राज्यभरात स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेलाही वेग देण्यात आला आहे. ‘महावितरण’कडून ग्राहकांना व्हॉट्सअॅपद्वारे पूर्वसूचना पाठवून पारंपरिक वीजमीटरच्या जागी स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, संदेश मिळाल्यानंतर ४८ तासांच्या आत मीटर बदलण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.







