पुणे: राज्यात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून कोकण किनारपट्टी, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत जोरदार पावसाची नोंद होत आहे. मात्र, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि पर्जन्यछायेच्या प्रदेशांमध्ये अद्यापही अपेक्षित पाऊस झालेला नसल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट कायम आहे. हवामानातील सध्याची स्थिती, पावसाचे असमान वितरण आणि पुढील काही दिवसांचा अंदाज याबाबत हवामान अभ्यासकांनी माहिती दिली.

अभ्यासकांच्या मते सध्या २२ ते २३ अंश उत्तर अक्षांशाच्या परिसरात हवामान प्रणाली सक्रिय आहे. त्याचा सर्वाधिक परिणाम उत्तर कोकण आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर दिसून येत आहे. पालघर, रायगड, नाशिक आणि पुण्याच्या घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाची शक्यता असून पुढील दोन दिवस या भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत असला तरी त्याची तीव्रता तुलनेने कमी आहे.

यंदाच्या मान्सून हंगामाच्या सुरुवातीला जून महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे अनेक भागांमध्ये पाण्याची टंचाई आणि पावसाची तूट निर्माण झाली होती. त्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात कोकण आणि घाटमाथ्यावर अतिवृष्टीसदृश पाऊस झाला. त्यामुळे त्या भागांतील पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त झाले. मात्र, पर्जन्यछायेच्या प्रदेशांपर्यंत या पावसाचा अपेक्षित परिणाम पोहोचला नाही.
सध्या सोलापूरमध्ये सुमारे २७ टक्के, बीडमध्ये ४३ टक्के, परभणीमध्ये ३५ टक्के, तसेच वाशीमसह मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची लक्षणीय तूट कायम आहे. गेल्या काही दिवसांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी पावसाची कमतरता पूर्णपणे भरून निघालेली नाही.
अभ्यासकांनी सांगितले की, महाराष्ट्रातील पावसाचे वितरण भौगोलिक रचनेशी जवळून संबंधित आहे. अरबी समुद्रातून येणारे दमट वारे सर्वप्रथम कोकण किनारपट्टीला धडकतात. सह्याद्री पर्वतरांगांवर आदळल्यानंतर या वार्यांमधील आर्द्रतेमुळे मोठ्या प्रमाणात ढग तयार होतात आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडतो. मात्र, हेच वारे पुढे मराठवाडा आणि पर्जन्यछायेच्या प्रदेशात पोहोचेपर्यंत त्यांतील आर्द्रता कमी झालेली असते. त्यामुळे त्या भागांमध्ये तुलनेने कमी पाऊस पडतो.
यंदा एल निनोचाही मान्सूनवर काही प्रमाणात प्रभाव दिसून येत असल्याचे सांगितले. एल निनोमुळे पाऊस पूर्णपणे थांबत नाही, परंतु त्याचे वितरण असमान होते. काही भागांत अतिवृष्टी होते, तर काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो. त्यामुळे संपूर्ण मान्सून हंगाम संपल्यानंतरच एल निनोचा नेमका परिणाम स्पष्ट होईल, असे अभ्यासकांनी नमूद केले.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. २३ जुलैसाठी ठाणे, पालघर, पुणे आणि नाशिकच्या घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून रायगड, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. २४ जुलैलाही पुण्याच्या घाटमाथ्यावर रेड अलर्ट कायम राहणार असून पालघर आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट असेल. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या काही भागांतही जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता असली तरी तेथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, शनिवारपासून राज्यातील बहुतांश भागांत पावसाची तीव्रता काहीशी कमी होण्याची शक्यता आहे. कोकण आणि घाटमाथ्यात काही ठिकाणी पाऊस सुरू राहील, तर उर्वरित भागांत तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.






