मुंबई : रोहित शर्माच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आलेले असतानाच वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी वनडे आणि टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने बुधवारी संघ जाहीर केला. वनडे संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी फलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजाचेही संघात पुनरागमन झाले आहे.

वनडे संघात आकिब नबी आणि नमन धीर या दोघांना प्रथमच संधी देण्यात आली आहे. शुभमन गिलकडे वनडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले असून केएल राहुल उपकर्णधार आहे. ऋतुराज गायकवाड, ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर बरार, मोहम्मद सिराज आणि यशस्वी जयस्वाल यांचाही संघात समावेश आहे. मात्र, यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला वनडे संघात स्थान मिळालेले नाही.

टी-२० संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यरकडे देण्यात आले असून तिलक वर्माची उपकर्णधारपदी निवड झाली आहे. अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, वैभव सूर्यवंशी, शिवम दुबे, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव आणि मयंक यादव यांचा संघात समावेश आहे.

दरम्यान, इराणी कपसाठी रेस्ट ऑफ इंडिया संघाचीही घोषणा करण्यात आली आहे. या संघाचे नेतृत्व ऋषभ पंतकडे सोपवण्यात आले आहे. त्यामुळे वनडे संघात स्थान न मिळालेल्या पंतकडे इराणी कपमध्ये नेतृत्वाची जबाबदारी असेल. सनत सांगवान, शिखर मोहन, सुदीप घरामी, सरफराज खान, स्मरण रविचंद्रन, मानव सुथार, सारांश जैन, आकाश दीप, मुकेश कुमार, मुकेश चौधरी, आर्यन जुयाल, आर्यन पांडे, अनुकूल रॉय आणि आयुष दोसेजा यांचा रेस्ट ऑफ इंडिया संघात समावेश आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धची वनडे मालिका २७ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. पहिला सामना तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर २७ सप्टेंबरला दुपारी २ वाजता होईल. दुसरा वनडे सामना ३० सप्टेंबरला गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. हा सामनाही दुपारी २ वाजता सुरू होईल. मालिकेतील तिसरा आणि अखेरचा वनडे सामना ३ ऑक्टोबरला मुल्लांपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंह इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर दुपारी २ वाजता खेळवण्यात येणार आहे.






