पुणे : धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटांत झालेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी तलवारसदृश हत्यार आणि फायटरचा वापर करून एकमेकांना मारहाण करण्यात आली. नवी खडकी परिसरातील डायमंड चौक येथे घडलेल्या या प्रकारात लक्ष्मीनगर पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून, चार जणांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये शिवम राजू ढेंबरे (वय २२, रा. चंद्रमानगर, प्रतिकनगर, येरवडा), शुभम वशिष्ठ तिवारी (वय २२, रा. मित्तल सोसायटी, प्रतिकनगर, येरवडा), सोहेल समीर खान (वय २२, रा. डायमंड चौक, भोसले वस्ती, येरवडा), शुभम शाम पोळ (वय २५, रा. डायमंड चौक, भोसले वस्ती, येरवडा) आणि साहिल समीर खान (वय २५, रा. डायमंड चौक, भोसले वस्ती, येरवडा) यांचा समावेश आहे.

राजू राहुल जाधव, ऋषिकेश देवदास जाधव, लखन कांबळे (तिघे रा. भोसले वस्ती, येरवडा) आणि शाहरुख शेख (रा. यशवंत नगर, येरवडा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार किरण शंकर भागीत (वय ३८) यांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. १४ सप्टेंबर रोजी रात्री पावणे आठच्या सुमारास नवज्योत मित्र मंडळाजवळ हा प्रकार घडला.

पोलिसांच्या माहितीनुसार, सहायक पोलीस निरीक्षक निखिल पवार, दत्तात्रय लिगाडे आणि त्यांचे सहकारी परिसरात गस्त घालत होते. डायमंड चौकाजवळ आल्यानंतर त्यांना मोठी गर्दी आणि आरडाओरड ऐकू आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता काही तरुण एकमेकांना मारहाण करताना दिसले. त्यापैकी एका तरुणाच्या हातात तलवारीसारखे हत्यार असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांना पाहताच काही जण पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. त्यावेळी पोलिसांनी पाठलाग करून पाच जणांना ताब्यात घेतले. चौकशीत शुभम पोळ याने सांगितल्याप्रमाणे, गणेशोत्सवाच्या मंडळाच्या डेकोरेशनचे काम करण्यासाठी काही जण डायमंड चौकातील रस्त्यावर थांबले होते. त्यावेळी राजू राहुल जाधव पायी जात असताना शुभमला धक्का लागला. त्यावर शुभमनेही त्याला धक्का दिला. या कारणावरून वाद वाढल्यानंतर राजू जाधव याने फोन करून चार ते पाच जणांना तेथे बोलावून घेतल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर दोन्ही गटांत हाणामारी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास लक्ष्मीनगर पोलीस करत आहेत.







