पुणे : पालखी महामार्गावरील नव्या टोलनाक्यामुळे काही दिवसांपासून बंद असलेली नीरा, जेजुरी आणि मोरगाव या भागातील पीएमपी बससेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. टोल शुल्काचा अतिरिक्त भार टाळण्यासाठी पीएमपी प्रशासनाने नवीन पर्यायी मार्गाचा अवलंब केला असून, त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महामार्गावरील नव्या टोलनाक्यावर प्रत्येक बसफेरीसाठी सुमारे 350 रुपयांचे शुल्क आकारले जात होते. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या पीएमपीने टोलमाफीची मागणी संबंधित यंत्रणेकडे केली होती. मात्र ती मान्य न झाल्याने काही दिवसांसाठी या मार्गांवरील बससेवा थांबवण्यात आली होती.

बससेवा बंद झाल्यामुळे नीरा, जेजुरी, मोरगाव आणि आसपासच्या गावांतील नागरिकांना पुण्यात ये-जा करण्यासाठी खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास खर्च वाढला होता. तसेच वेळेचाही मोठा अपव्यय होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर बेलसर फाटा मार्गे बस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. या मार्गावर टोल भरावा लागत नसल्याने पीएमपीचा अतिरिक्त खर्च वाचणार असून सेवा सुरळीत ठेवणे शक्य झाले आहे.
पीएमपी प्रशासनाच्या माहितीनुसार, या मार्गांवर एकूण 15 बस प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात आल्या आहेत. दिवसभरात या बस मिळून 94 फेऱ्या पूर्ण करणार आहेत. त्यामध्ये जेजुरी मार्गावर 10 बस, नीरा मार्गावर 4 बस आणि मोरगाव मार्गासाठी 1 बस उपलब्ध करण्यात आली आहे.







