लोणी काळभोर, ता. ३ : जगतगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षेचा दाखला देत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) कवडीपाट टोलनाका ते पाटसदरम्यान अनधिकृत फ्लेक्स व होर्डिंग्जवर धडक कारवाई केली होती. काही ठिकाणी लोखंडी सांगाडे हटवण्यात आले, तर जागामालक व संबंधितांवरही कारवाई करण्यात आली. मात्र, पालखी सोहळा पुढे सरकताच पुन्हा त्याच ठिकाणी अनधिकृत होर्डिंग्ज पुन्हा उभी राहिल्याचे चित्र समोर आले आहे. सध्या सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर हे धोकादायक लोखंडी सांगाडे नागरिकांच्या जीवावर बेतू शकतात, अशी भीती व्यक्त होत असून, दुर्घटना घडण्यापूर्वीच PMRDAने तातडीने व्यापक मोहीम राबवावी, अशी मागणी पूर्व हवेलीतील नागरिकांनी केली आहे.

पीएमआरडीएच्या अधिकारक्षेत्रातील कवडीपाट (हवेली) ते पाटस (दौंड) या पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पालखीपूर्वी मोठ्या प्रमाणावर कारवाई झाली. मात्र, कारवाई थांबताच अनेक ठिकाणी पुन्हा त्याच जागांवर लोखंडी सांगाडे उभारण्यात आले असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे कारवाई ही केवळ पालखीपुरती मर्यादित होती का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. कवडीपाट ते पाटसदरम्यान २०० हून अधिक अनधिकृत होर्डिंग्ज उभारण्यात आली आहेत. अधिकृत होर्डिंग्जची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असताना उर्वरित मोठ्या प्रमाणात संरचना नियमबाह्य असल्याचा दावा केला जात आहे.

दरम्यान, पुणे सोलापूर मार्गावरील अनेक होर्डिंग्ज लोकवस्तीमध्ये आहेत. काहींच्या खाली टपऱ्या, दुकाने, हॉटेल्स आणि हातगाड्या सुरू आहेत. काही ठिकाणी पथदिव्यांच्या खांबांवरही होर्डिंग्ज बसवण्यात आल्याचे दिसून येते. वादळी वाऱ्यात एखादा लोखंडी सांगाडा कोसळला, तर त्याची किंमत निष्पाप नागरिकांना जीव गमावून चुकवावी लागू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.
दुर्घटना झाल्यावरच कारवाई होणार का?
पीएमआरडीए, जिल्हा प्रशासन आणि संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था कारवाईच्या नावाखाली केवळ औपचारिकता पूर्ण करत आहेत. सातत्यपूर्ण आणि प्रभावी कारवाईचा अभाव असल्याने अनधिकृत होर्डिंग्ज पुन्हा उभी राहत आहेत. त्यामुळे मोठी दुर्घटना झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत.
‘या’ ठिकाणांवरील होर्डिंग्जवर होणार कारवाई?
एमआयटी कॉर्नर, थेऊर फाटा, कुंजीरवाडी, नायगाव फाटा, सोरतापवाडी, उरुळी कांचन (एललाईट चौक, तळवडी चौक), यवत, चौफुला, वरवंड आणि पाटस या परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत होर्डिंग्ज असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही होर्डिंग्ज लोकवस्ती आणि महामार्गालगत असल्याने पादचारी व वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. काही जागामालक प्रभावशाली राजकीय व्यक्तींशी संबंधित असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई टाळली जाते. त्यामुळे कायद्याचा धाक सर्वांसाठी समान आहे की काहींसाठी वेगळा? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
पीएमआरडीएने तातडीने दखल घ्यावी
कवडीपाट ते पाटस या संपूर्ण महामार्गावरील सर्व अनधिकृत व धोकादायक होर्डिंग्जचे संयुक्त सर्वेक्षण करून तातडीने हटवावेत. “दुर्घटना झाल्यानंतर पंचनामे करण्यापेक्षा, ती होण्यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करा. कारवाई केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात सातत्याने व्हावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी नागरिकांनी पीएमआरडीएकडे मागणी केली आहे.






