पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरात पावसाळी वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे. सतत बदलणारे हवामान, वाढलेली आर्द्रता आणि ओलसर वातावरणामुळे आता डोळ्यांच्या संसर्गाचा धोका वाढला आहे. सध्या पिंपरी-चिंचवड परिसरात ‘आय फ्लू’ म्हणजेच कन्जंक्टिव्हायटिसच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

विशेषतः लहान मुलांमध्ये या संसर्गाचा प्रसार वेगाने होत असून, घरातील एका व्यक्तीला संसर्ग झाल्यानंतर इतरांनाही त्याची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन नेत्ररोग तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.

आय फ्लू झाल्यानंतर डोळ्यांमध्ये लालसरपणा येणे, सतत खाज सुटणे, जळजळ होणे किंवा डोळ्यात काहीतरी टोचत असल्यासारखे जाणवणे अशी लक्षणे दिसू शकतात. याशिवाय डोळ्यांतून वारंवार पाणी येणे, चिकट पदार्थ बाहेर पडणे आणि सकाळी उठल्यानंतर पापण्या चिकटणे हीदेखील या संसर्गाची सामान्य लक्षणे आहेत.

हा आजार संसर्गजन्य असल्याने तो टाळण्यासाठी स्वच्छतेची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी नियमितपणे साबण आणि स्वच्छ पाण्याने हात धुवावेत. घाण हातांनी डोळ्यांना स्पर्श करणे टाळावे. तसेच रुमाल, टॉवेल, उशीचे कव्हर किंवा चष्मा यांसारख्या वस्तू इतरांसोबत वापरू नयेत.
डोळ्यांना संसर्ग झाल्यास इतर व्यक्तींना लागण होऊ नये यासाठी काळा चष्मा वापरण्याचा सल्लाही तज्ज्ञ देत आहेत. दरम्यान, डोळ्यांमध्ये त्रास जाणवल्यास घरगुती उपाय किंवा स्वतःहून औषधे घेण्याऐवजी तज्ज्ञ नेत्ररोग डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.







