Jalgaon Missing News: जळगाव : जळगाव जिल्ह्यातील एका लग्नसमारंभासाठी खासगी कारने निघालेल्या दाम्पत्य अचानक बेपत्ता झाले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दाम्पत्य बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मलकापूर महामार्गावरून बेपत्ता (Missing) झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेचा पोलीस तपास करत आहे. (Jalgaon News)

हेही वाचा- ‘झटपट पैसा’ कमावण्याच्या नादात… तरुणीला आला ‘ऑनलाइन टास्क’चा मेसेज.. आणि पुढे काय घडलं वाचा सविस्तर
मिळालेल्या माहितीनुसार, पद्मसिंह दामू पाटील आणि त्यांची पत्नी नम्रता पाटील अशी बेपत्ता झालेल्यांची नावे आहे. ते MH 13 BN 8583 क्रमांकाच्या कारने पाचोरा (जळगाव) येथे लग्नासाठी निघाले होते. पद्मसिंह पाटील हे तेलंगणा राज्यातील सितापूरम येथील एका खासगी सिमेंट कंपनीत कार्यरत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाम्पत्याने 27 नोव्हेबर रोजी सायंकाळी 6:30 वाजता नातेवाईकांशी शेवटचा संवाद साधला होता. नातेवाईक वेळेत पाचोरा येथे पोहोचले, मात्र दाम्पत्य पोहोचले नाही. वारंवार फोन केल्यावर दोघांचेही मोबाईल स्विच ऑफ आढळल्याने संशय आणखी गडद झाला.
तपासात पाटील दाम्पत्याचे मोबाईलचे शेवटचे लोकेशन बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव–मलकापूर महामार्गावरील वडनेर भोजली (ता. नंदूरा) गावाजवळ मिळाले. तसेच, त्यांच्या कारने (गुरुवारी) 27 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7:11 PM वाजता बाळापूरजवळील तरोडा टोल नाका ओलांडल्याचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. मात्र त्यानंतर त्या कारचा कोणताही थांगपत्ता सापडला नाही.
या प्रकरणी दाम्पत्याचे नातेवाईक संदीप रमेश पाटील यांनी नांदुरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. विशेष म्हणजे, महामार्गावर कुठेही अपघाताची नोंद नसल्याने आणि कारचा मागोवा न लागल्याने या घटनेमागे घातपाताचा गंभीर संशय व्यक्त होत आहे.





