लोणी काळभोर, ता. 8 : आज कोण उठसूट मोबाईल काढून व्हिडीओ काढत सुटलंय? कामाला वेळ लागतोय म्हणून थेट कॅमेरा सुरू करायचा, दबाव आणायचा आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांना धारेवर धरायचं, हा प्रकार सध्या अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. मात्र, व्हिडीओ काढून काम लवकर होण्याऐवजी उलट कामाचा वेग मंदावतोय का, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

पुणे महानगरपालिका, नगरपालिका, क्षेत्रीय कार्यालये, खरेदी-विक्री कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांपासून पोलीस ठाणे, प्रवास कार्यालये, बँका आणि विविध शासकीय, निमशासकीय व खासगी सेवा संस्थांमध्ये नागरिकांची कामे असतात. अनेक नागरिकांची कामे आधीच प्रलंबित असतात. त्यातच प्रत्येकाला आपले काम आधी व्हावे, अशी अपेक्षा असते. त्यामुळे कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण असतानाच, ‘माझं काम आधी करा’ या आग्रहातून निर्माण होणारा दबाव परिस्थिती अधिक गुंतागुंतीची करतो.

एखाद्या अधिकाऱ्याने ‘कामाला वेळ लागेल’ असे सांगितले की, काही तक्रारदार तातडीने मोबाईल बाहेर काढतात. व्हिडीओ सुरू होतो, प्रश्नांची सरबत्ती होते आणि वातावरण तणावपूर्ण बनते. परिणामी, अधिकाऱ्यांसमोर असलेली इतर कामेही बाजूला पडतात. ज्या कामाला काही वेळ लागणार होता, त्यालाच अधिक वेळ लागू शकतो. त्यामुळे नागरिकांनीही संयमाने भूमिका घेणे गरजेचे आहे.

अधिकारी म्हणजे कोणाच्याही दबावाला बळी पडणारी व्यक्ती नव्हे!
शासकीय कार्यालयात येणारा प्रत्येक नागरिक महत्त्वाचा आहे. तो सामान्य नागरिक असो, राजकीय नेता असो, वकील, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता किंवा कोणत्याही संस्थेचा पदाधिकारी असो; नियम सर्वांसाठी समान असले पाहिजेत. मात्र, कामाला वेळ लागतोय म्हणून थेट मोबाईल कॅमेरा सुरू करून दबाव आणणे, धमकीवजा भाषा वापरणे किंवा अधिकाऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणे, हा योग्य मार्ग नाही.
एखाद्या अधिकाऱ्याने तक्रारीची दखल घेतली नाही, काम प्रलंबित ठेवले किंवा अनावश्यक विलंब केला, तर त्याविरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करता येते. तक्रारीचा अधिकार नागरिकांना आहे; पण तक्रार करण्याची पद्धतही तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे नागरिकांनीही समजुतीने आणि नियमांच्या चौकटीत राहून आपली बाजू मांडली पाहिजे.
पोलीस ठाण्यांतील व्हिडीओबाजीवरही विचार करण्याची गरज
पोलीस ठाण्यांमध्ये सध्या विविध कारणांनी व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. मात्र, पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांवर बंदोबस्त, दिवसपाळी-रात्रपाळी, सण-उत्सव, नेत्यांचे ताफे, तपास आणि इतर अनेक जबाबदाऱ्या असतात. या सगळ्या कामांमध्ये ते आधीच व्यस्त असतात. त्यातच प्रत्येक गोष्टीवर व्हिडीओ काढून दबाव आणला, तर काम करण्याचे वातावरण अधिक तणावपूर्ण होऊ शकते.
अधिकारी-कर्मचाऱ्यांकडूनही नागरिकांशी सौजन्याने वागणे, तक्रारींची योग्य दखल घेणे आणि कामकाजात पारदर्शकता ठेवणे अपेक्षित आहे. मात्र, नागरिकांनीही ‘काम होत नाही म्हणून व्हिडीओ’ हा एकमेव मार्ग समजण्याऐवजी, संवाद, तक्रार निवारणाची प्रक्रिया आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागण्याचा मार्ग स्वीकारला पाहिजे.
दरम्यान,व्हिडीओ काढणे हा अधिकार असू शकतो; पण त्याचा वापर दबाव, धमकी किंवा कामात अडथळा निर्माण करण्यासाठी होऊ नये. नागरिक आणि अधिकारी-कर्मचारी यांच्यात परस्पर सन्मान, संयम आणि समजूतदारपणा असेल, तरच शासकीय कामकाज अधिक सुरळीत होईल. त्यामुळे ‘माझं काम आधी’ या आग्रहापेक्षा ‘सर्वांचं काम नियमानुसार’ हा विचार महत्त्वाचा आहे.







