पुणे: पुण्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या कामाचा धक्कादायक नमुना समोर आला आहे. कर्वेनगर येथील बराटे उड्डाणपुलावर अवघ्या 3 दिवसांपूर्वी करण्यात आलेले डांबरीकरण चक्क वितळल्याची घटना घडली आहे. रस्त्यावर डांबर अक्षरशः वाहू लागल्याने वाहनचालकांसाठी हा मार्ग धोकादायक ठरला असून प्रशासनाने खबरदारी म्हणून पूल तात्पुरता बंद केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात तापमानात वाढ झाली आहे. मात्र इतक्या कमी कालावधीत डांबर वितळणे हे निकृष्ट दर्जाच्या कामाचे लक्षण मानले जाते. नव्याने टाकलेला डांबराचा थर बुधवारी वाढलेल्या उन्हामुळे मऊ पडला आणि रस्त्यावर चिकट थर तयार झाला. त्यामुळे वाहनांचे टायर घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
प्रशासनाने पूल बंद केला असला तरी काही वाहनचालक बॅरिकेड्स बाजूला करून जीव धोक्यात घालून पुलावरून जात असल्याचे दिसत आहे. वितळलेल्या डांबरामुळे विशेषतः दुचाकीस्वारांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. टायरला डांबर चिकटल्याने वाहनांचे नुकसानही होत आहे.
या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. “आम्ही भरलेला कर अशा निकृष्ट कामांसाठी वापरला जातो का?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. भर उन्हाळ्यात डांबरीकरण करण्याचा निर्णय का घेतला आणि वापरलेल्या साहित्याचा दर्जा कोणी तपासला, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणात संबंधित कंत्राटदार आणि देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेच रस्ता तातडीने दुरुस्त करून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.







