Raj Thackeray : लोकसभेत सादर करण्यात आलेल्या महिला आरक्षण आणि लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करत केंद्र सरकारवर टीका केली आहे.
राज ठाकरे यांनी म्हटले की, भाजप गेली 10 वर्षे आमदार, खासदार आणि राजकीय पक्ष फोडण्याचे काम करत आहे. डिलिमिटेशनच्या माध्यमातून स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रक्रियेमुळे देशात विभागणी होऊ शकते आणि राज्यांमध्ये स्वायत्ततेच्या मागण्या वाढू शकतात, असा इशाराही त्यांनी दिला. पंजाबमधील खलिस्तान चळवळीचा संदर्भ देत त्यांनी भविष्यात अशा प्रकारचा असंतोष इतर राज्यांत निर्माण होऊ शकतो, असे म्हटले.
केंद्र सरकारला उद्देशून त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचा उल्लेख केला. देश एकत्र ठेवण्यासाठी झालेल्या संघर्षाचा विचार करून निर्णय घ्यावा, असे त्यांनी सांगितले. तसेच गुजरात, पश्चिम बंगाल, पंजाब, महाराष्ट्र, गोवा, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ आणि आसामसह इतर राज्यांसाठी किमान हमी जागा देण्याची मागणी त्यांनी केली. उर्वरित जागांचे वाटप लोकसंख्येनुसार करावे, असेही ते म्हणाले.
महिला आरक्षण विधेयकाबाबत बोलताना राज ठाकरे यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दर्शवला. महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यास विरोध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, विधेयकावर चर्चा सुरू असताना केंद्र सरकारने अधिसूचना काढून ते लागू केल्याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयक हे 131 व्या घटना दुरुस्तीशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. या मुद्द्यावर विरोधी पक्षांकडूनही दक्षिणेकडील राज्यांचे राजकीय महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.







