पुणे: पुणेकरांना पुन्हा एकदा पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा अपेक्षेइतका वाढला नसल्याने पुणे महापालिकेने उद्यापासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यंदा मान्सूनच्या सुरुवातीला अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याचा परिणाम खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठ्यावर झाला आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांमध्ये सध्या एकूण 57.85 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा साठा 72.89 टक्के होता. म्हणजेच यंदा धरणांतील पाणीसाठा लक्षणीय प्रमाणात कमी आहे.

आषाढी वारीच्या काळात लाखो वारकरी पुण्यात दाखल झाल्यामुळे नागरिकांसह वारकऱ्यांना पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महापालिकेने काही दिवस पाणीकपात स्थगित केली होती. मात्र, धरणांमधील सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन पुन्हा दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या खडकवासला धरणात 93.31 टक्के, पानशेतमध्ये 60.63 टक्के, वरसगावमध्ये 55.41 टक्के, तर टेमघर धरणात केवळ 39.43 टक्के पाणीसाठा आहे. विशेषतः टेमघर धरणातील कमी साठ्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार 20 जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मात्र, तोपर्यंत पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन पाणीकपात कायम ठेवण्यात येणार आहे. धरणे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतरच या निर्णयाचा फेरविचार केला जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महापालिकेने नागरिकांना पाण्याचा अपव्यय टाळून काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले असून पुढील काही दिवस पावसाकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.







