पुणे: पुण्यातील पत्रकारिता क्षेत्रासाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. तरुण, उत्साही आणि कर्तव्यनिष्ठ पत्रकार ज्योती कदम यांचे अकाली निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण कदम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून पुणे पत्रकारिता वर्तुळात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

ज्योती कदम यांनी आपल्या पत्रकारितेच्या प्रवासात अनेक नामांकित संस्थांमध्ये काम करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी प्राईम न्यूज, लेटेस्टली मराठी आणि महाराष्ट्र जागरण यांसारख्या माध्यमांमध्ये काम करत आपल्या लेखणीचा ठसा उमटवला. विशेष म्हणजे पुणे प्राईम न्यूज सोबतच्या त्यांच्या कामामुळे त्यांनी सहकाऱ्यांमध्ये विश्वास आणि जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले होते. सध्या त्या महाराष्ट्र जागरणमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत होत्या.
मंगळवारपर्यंत त्या नेहमीप्रमाणे कार्यालयात येऊन आपले काम करत होत्या. मात्र बुधवारी त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. एका दिवसापूर्वी एकत्र काम केलेली सहकारी अचानक कायमची दूर गेल्याने कार्यालयातील वातावरण शोकाकुल झाले आहे.
ज्योती कदम या अत्यंत मेहनती, प्रामाणिक आणि सकारात्मक विचारांच्या पत्रकार होत्या. कमी वेळात त्यांनी वाचकांमध्ये आणि सहकाऱ्यांमध्ये आपली खास ओळख निर्माण केली होती. त्यांच्या जाण्याने एक आश्वासक करिअर अकाली संपुष्टात आले आहे.
त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावरून सहकारी, मित्रपरिवार आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. पुणे प्राईम न्यूज परिवाराकडूनही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
“ज्योती, तुमची उणीव कायम जाणवत राहील. तुमचे हसरे व्यक्तिमत्व, कामाप्रती असलेली निष्ठा आणि सकारात्मक ऊर्जा आम्हाला नेहमी प्रेरणा देत राहील. पुणे प्राईम न्यूज परिवाराकडून तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली.”






