पुणे: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकांमध्ये यंदा अनेक ठिकाणी बिनविरोध निवडीचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील 17 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असताना महायुतीने मतदानापूर्वीच काही जागांवर विजय निश्चित केला आहे. अनेक ठिकाणी बंडखोरी रोखण्यातही महायुतीला यश मिळाल्याचे दिसून येत आहे.

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम संजय काकडे यांची विधान परिषदेसाठी बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे उमेदवार श्रीकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे तसेच भाजपचे बंडखोर उमेदवार प्रदीप कंद यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने काकडे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. पक्षाच्या निर्देशानुसार माघार घेतल्याचे श्रीकांत पाटील यांनी सांगितले.
वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपचे अरुण लखानी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघात निवडणुकीची गरज उरलेली नाही.
यवतमाळ मतदारसंघातही सर्व उमेदवारांनी माघार घेतल्याने शिवसेनेचे (शिंदे गट) दुष्यंत चतुर्वेदी यांची बिनविरोध निवड झाली आहे. विशेष म्हणजे यवतमाळच्या विधान परिषद निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच अशी बिनविरोध निवड झाली आहे.
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. महायुतीच्या पाठिंब्यामुळे ही जागा बिनविरोध झाल्याची प्रतिक्रिया महायुतीच्या नेत्यांनी दिली आहे.
अर्ज माघारीनंतर राज्यातील अनेक मतदारसंघांतील निवडणूक चित्र स्पष्ट झाले असून काही ठिकाणी मतदानाची आवश्यकता राहिली नाही. तर उर्वरित मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होणार आहे.







