पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात पाणीटंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाने यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज वर्तवल्याने जलसंपदा विभागाने आतापासूनच खबरदारीचे पाऊल उचलले आहे. खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा 31 ऑगस्टपर्यंत टिकवण्यासाठी पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि एमआयडीसीला दरमहा 15 टक्के पाणी कपात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अल-निनो आणि आयओडीच्या प्रभावामुळे यंदा मान्सून कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भविष्यात गंभीर पाणीटंचाई टाळण्यासाठी नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एप्रिल महिन्यात जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेला पत्र पाठवून पाण्याचा वापर नियंत्रित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
या पत्रात खडकवासला धरणातील पाणी 31 ऑगस्टपर्यंत पुरेल याची काळजी घेण्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. तसेच जर पाणी कपात केली नाही, तर भविष्यात निर्माण होणाऱ्या टंचाईसाठी संबंधित यंत्रणा जबाबदार राहील, असेही सांगण्यात आले आहे.
सध्याच्या आकडेवारीनुसार खडकवासला धरणात 43 टक्के, पानशेतमध्ये 56 टक्के, वरसगावमध्ये 46 टक्के आणि टेमघर धरणात केवळ 11.88 टक्के पाणीसाठा आहे. एकूण प्रकल्पातील पाणीसाठा सुमारे 45 टक्के आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा साठा 41 टक्के होता.
या पार्श्वभूमीवर पुणेकरांना येत्या काळात पाणी जपून वापरण्याची गरज आहे. उन्हाळ्याच्या वाढत्या झळांसोबतच आता पाणी कपातीचाही सामना करावा लागू शकतो.







