पुणे: पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी आणि शहराचा झपाट्याने होत असलेला विस्तार पाहता भविष्यातील गरजा लक्षात घेऊन पायाभूत सुविधांचे नियोजन करण्याची गरज आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. मुंबई-पुणे महामार्ग बांधताना भविष्यात पुणे एवढ्या वेगाने वाढेल, याचा अंदाज नव्हता. त्यामुळे त्यावेळी केलेले रस्ते नियोजन आजच्या वाढत्या वाहतुकीच्या तुलनेत अपुरे ठरत असल्याची कबुली त्यांनी दिली.

लवळे येथील सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या ‘फेस्टिव्हल ऑफ थिंकर्स’ कार्यक्रमात गडकरी बोलत होते. पुण्यात प्रदूषण आणि वाहतूक कोंडीच्या समस्या असतानाही शहरात येणाऱ्या नागरिकांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे पुणे आता जवळपास ‘हाऊसफुल’ झाले असून, तात्पुरत्या उपायांपेक्षा पुढील अनेक वर्षांचा विचार करून रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गडकरी म्हणाले की, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना मुंबई-पुणे महामार्गासाठी सुरुवातीला चारपदरी रस्त्याचा प्रस्ताव होता. मात्र, भविष्यातील वाहतूक लक्षात घेऊन त्यांनी सहापदरी रस्त्याचा आग्रह धरला. तरीही आज हा मार्गही अपुरा पडत आहे. त्यामुळे रस्ते, पूल, बोगदे आणि इतर दळणवळणाच्या सुविधा उभारताना किमान पुढील ५० वर्षांचा विचार करणे गरजेचे आहे.

पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे-शिरूर, हडपसर-यवत, तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि खेड-नाशिक फाटा या मार्गांवर विविध कामे हाती घेतली जाणार आहेत. पुणे-संभाजीनगर मार्ग सहापदरी करण्याचे कामही सुरू आहे. या सर्व रस्ते आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी पुढील काळात सुमारे ६० हजार कोटी रुपयांची कामे करण्याचे नियोजन असल्याचे गडकरी यांनी सांगितले. चांगल्या पायाभूत सुविधांमुळे उद्योग, व्यापार, पर्यटन आणि रोजगाराच्या संधी वाढण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.







