पुणे : शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे बेकायदेशीरपणे भिशी चालवून गुंतवणुकीची रक्कम दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत सुमारे 39 जणांकडून 20 कोटींहून अधिक रक्कम जमा करून तिचा कथित अपहार केल्याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी तीन महिलांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

सुलभा शरद नवले (वय 50), नितीन शरद नवले (वय 32), सुहास शरद नवले (वय 30), अश्विनी नितीन नवले आणि प्रतिक्षा सुहास नवले, सर्व रा. कारेगाव, ता. शिरूर, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी सुलभा, नितीन आणि सुहास नवले यांना अटक केली असून शिरूर न्यायालयाने त्यांना 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बारकू चंदर सोनवणे यांनी याबाबत तक्रार दिली आहे. आरोपींनी 2020 मध्ये कारेश्वर भिशी मंडळ सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. कोणत्याही सरकारी कार्यालयात, बँकेत किंवा धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी नसतानाही भिशी मंडळ नोंदणीकृत असल्याचे भासवून नागरिकांना गुंतवणुकीवर दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आल्याचा आरोप आहे.

ही भिशी डिसेंबर 2025 पर्यंत सुरू होती. त्यानंतर गुंतवणूकदारांनी मूळ रक्कम आणि परतावा मागितल्यानंतर संबंधितांकडून टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच काही गुंतवणूकदारांना दमदाटी करण्यात आल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी संबंधितांचे जबाब नोंदवून गुंतवणुकीच्या नोंदींची पडताळणी केली. त्यानंतर फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्राथमिक तपासात सोनवणे यांच्यासह सुमारे 39 जणांनी एकूण 20 कोटी 34 लाख 65 हजार 500 रुपये गुंतवल्याचे समोर आले आहे.
ही रक्कम रोख तसेच ऑनलाइन पद्धतीने विविध बँक खात्यांमध्ये जमा करून तिचा कथित अपहार करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.







