पुणे : प्रसूतीसाठी मायमर हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या ३७ वर्षीय महिलेचा आणि तिच्या नवजात बाळाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृत महिलेचे नाव रूपाली सोमनाथ इंदलकर (वय ३७, रा. कुसगाव बुद्रुक, ता. मावळ) असे आहे. या घटनेनंतर नातेवाईकांनी संताप व्यक्त करत डॉक्टरांच्या कथित हलगर्जीपणामुळे महिला आणि बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.

रूपाली इंदलकर यांना प्रसूतीसाठी मायमर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या नवजात बाळाचीही प्रकृती गंभीर झाल्याने त्याला पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तेथे बाळाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. डॉक्टरांच्या कथित हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करत मायमर हॉस्पिटलविरोधात गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला.

घटनेची माहिती मिळताच मावळचे आमदार सुनील शेळके यांनी रुग्णालयात जाऊन नातेवाईकांची भेट घेतली. त्यांनी नातेवाईकांशी चर्चा करून प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याचे आश्वासन दिले. तसेच पुरावे लपवण्याचा प्रयत्न झाल्यास एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
सुनील शेळके म्हणाले, “रुग्णाचं हित लक्षात घेऊन आरोग्य सेवा दिली पाहिजे. केवळ पैशांसाठी आरोग्य सेवा दिली जात असेल, तर अशा रुग्णालयावर कारवाई करून ते बंद करण्याची वेळ आली तरी आम्ही मागे हटणार नाही. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे महिला आणि नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. डॉक्टर आणि संबंधित रुग्णालय या मृत्यूस जबाबदार असल्याचा त्यांचा आरोप आहे.”
या प्रकारापूर्वीही अशाच स्वरूपाच्या तीन ते चार घटना घडल्याची माहिती आपल्यासमोर आली असल्याचे शेळके यांनी सांगितले. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री आणि पोलिसांना माहिती देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आईचा मृत्यू झाल्यानंतर बाळाला वाचवण्यासाठी तातडीने प्रयत्न करायला हवे होते, असा आरोपही नातेवाईकांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, महिलेचा सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. त्यानंतर बाळाला तातडीने ससून रुग्णालयात हलवणे अपेक्षित होते. मात्र, रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बाळाला ससून रुग्णालयात पाठवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात महिलेचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, उपचारादरम्यान वैद्यकीय त्रुटी झाल्या होत्या का आणि बाळाला वेळेत उपचार मिळाले का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. या सर्व बाबी चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहेत.
दरम्यान, रुग्णाच्या उपचारासंदर्भातील सर्व कागदपत्रे ससून रुग्णालयात दाखल करण्यात येणार असून, तेथील समितीकडून या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांनी दिली आहे.
महिला आणि नवजात बाळाच्या मृत्यूमुळे मायमर हॉस्पिटलच्या उपचारपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले असून, या प्रकरणातील नेमके सत्य चौकशीनंतर समोर येणार आहे.







