पुणे : राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबाबत इस्कॉन खारघरचे अध्यक्ष डॉ. सूरदासजी यांनी केलेल्या एका वक्तव्याची सध्या चर्चा सुरू आहे. ‘श्रीमद्भागवत’ ग्रंथाचे संपूर्णपणे वाचन करून तो जीवनात आचरणात आणणाऱ्या व्यक्तीचा अपघाती किंवा अकाली मृत्यू होत नाही, असा दावा त्यांनी केला आहे.

मागील आषाढी एकादशीला डॉ. सूरदासजी यांनी अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना ‘श्रीमद्भागवत’ ग्रंथ भेट दिला होता. हा ग्रंथ नक्की वाचावा, असा आग्रहही त्यांनी अजित पवार यांच्याकडे केला होता. मात्र, अजित पवार यांनी हा ग्रंथ वाचला नसावा, असे डॉ. सूरदासजी यांनी म्हटले आहे.

अजित पवार यांचा काही महिन्यांपूर्वी बारामतीजवळ विमान अपघातात मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर डॉ. सूरदासजी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

डॉ. सूरदासजी नेमकं काय म्हणाले?
डॉ. सूरदासजी म्हणाले, “जो कोणी हा श्रीमद्भागवत ग्रंथ संपूर्णपणे आपल्या आयुष्यात स्वीकारतो किंवा अमलात आणतो, त्याचा अपघाती किंवा अकाली मृत्यू होत नाही. मी गेल्या आषाढी एकादशीला स्वतःच्या हातांनी अजित पवारजींना हा ग्रंथ भेट दिला होता आणि त्यांना विनंती केली होती की कृपया हा ग्रंथ नक्की वाचा. पण मला पूर्ण विश्वास आहे की त्यांनी तो वाचला नाही.”
“मी त्यांच्या दालनात जाऊन त्यांना हा ग्रंथ भेट दिला होता. त्यांना वारंवार हा ग्रंथ वाचण्याची विनंती केली होती. याला इतर कोणत्याही सामान्य पुस्तकासारखे समजू नका, असेही मी त्यांना सांगितले होते,” असेही डॉ. सूरदासजी यांनी सांगितले.
दरम्यान, श्रीमद्भागवताच्या वाचनामुळे अपघाती मृत्यू टळतो, हा डॉ. सूरदासजी यांचा वैयक्तिक धार्मिक विश्वास असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येते. या दाव्याला कोणताही वैज्ञानिक आधार असल्याचे या वक्तव्यातून सिद्ध होत नाही.






