पुणे : मुंबई-पुणे दरम्यान दररोज लाखो प्रवासी जुन्या मुंबई-पुणे महामार्गाचा वापर करतात. मात्र वाढती वाहतूक, घाटातील सततची कोंडी आणि प्रवासातील विलंब लक्षात घेता या महामार्गाच्या सहापदरीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याचे काम हाती घेतले असून, आराखडा पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पाचे अंतिम स्वरूप निश्चित होणार आहे.

या प्रकल्पाचा मुख्य उद्देश वाहतूक सुरळीत करणे आणि प्रवासाचा वेळ कमी करणे हा आहे. विशेषतः लोणावळा-खंडाळा घाट परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नवीन रस्ते आणि पर्यायी मार्ग विकसित करण्याचाही प्रस्ताव विचाराधीन आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे ५,००० ते ६,००० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा खर्च टोलच्या माध्यमातून वसूल करण्याची योजना असल्याने जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील टोल वसुलीचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे.
सध्या या महामार्गावर २०३५ पर्यंत टोल वसूल करण्यास परवानगी आहे. मात्र सहापदरीकरणाचा प्रकल्प मंजूर झाल्यास हा कालावधी आणखी १० ते १५ वर्षांनी वाढून २०४५ ते २०५० पर्यंत टोल आकारला जाऊ शकतो.
ब्रिटीश काळात मुंबई आणि दख्खन पठाराला जोडण्यासाठी बोरघाटातून हा रस्ता तयार करण्यात आला होता. पुढे तो राष्ट्रीय महामार्ग म्हणून विकसित झाला आणि सध्या तो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ (NH-48) चा भाग आहे.
एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या नियुक्त सल्लागारामार्फत प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून, तो पूर्ण झाल्यानंतर सहापदरीकरण, नवीन मार्ग आणि इतर प्रस्तावित बदलांचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.






