मुंबई, ता. 29: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांच्या अलीकडच्या राजकीय हालचालींमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असतानाच, शनिवारी मुंबईत झालेल्या पक्षाच्या महत्त्वपूर्ण कोअर कमिटीच्या बैठकीला त्यांनी अनुपस्थिती लावल्याने नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती असलेल्या बैठकीला रोहित पवार गैरहजर राहिल्याने त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत तर्कवितर्कांना वेग आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यभर दौरे, आंदोलने आणि विविध राजकीय कार्यक्रमांमध्ये रोहित पवार सक्रिय दिसत आहेत. त्यातच काँग्रेसशी वाढलेली जवळीक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. आता थेट पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीपासून त्यांनी दूर राहिल्याने त्यांच्या राजकीय वाटचालीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या बैठकीला मुंबईतील बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह जितेंद्र आव्हाड, हर्षवर्धन पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी आमदार अशोक पवार, राजेंद्र शिंगणे, अनिल देशमुख आणि खासदार निलेश लंके आदी प्रमुख नेते उपस्थित होते.

दहा दिवसांपूर्वी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांसोबत झालेल्या बैठकीत मांडण्यात आलेल्या विविध प्रश्नांवर तसेच पक्षाच्या आगामी राजकीय रणनीतीवर कोअर कमिटीमध्ये चर्चा झाल्याचे समजते. नाशिक कुंभमेळ्याच्या नावाखालील कथित बोगस भरती रॅकेट, शासकीय भरतीतील पेपरफुटी आणि विविध गैरव्यवहार यांसारख्या मुद्द्यांवरही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.

विलिनीकरणाच्या चर्चेत रोहित पवारांची भूमिका महत्त्वाची
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना सध्या पुन्हा वेग आला आहे. दुसरीकडे, भाजपसोबत हातमिळवणी करून एनडीएमध्ये सहभागी होण्याच्या भूमिकेला रोहित पवारांचा विरोध असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पक्षाच्या भविष्यातील राजकीय दिशेबाबत त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान, आपल्या अनुपस्थितीची माहिती प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना रोहित पवारांनी दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, त्यांच्या गैरहजेरीमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
‘दांडी’मागे राजकीय संकेत?
रोहित पवारांची कोअर कमिटीच्या बैठकीतील अनुपस्थिती, काँग्रेसशी वाढलेली जवळीक आणि गेल्या काही दिवसांतील त्यांच्या राजकीय हालचाली यांची सांगड घातली जात असल्याने ‘रोहित पवारांच्या मनात नेमके चालले तरी काय?’ असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. रोहित पवार पक्ष सोडणार, वेगळी राजकीय भूमिका घेणार किंवा कोणत्याही नव्या आघाडीच्या दिशेने पाऊल टाकणार, अशा चर्चांना सध्या उधाण आले असले तरी रोहित पवार किंवा राष्ट्रवादीकडून याबाबत कोणतेही अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चा केवळ राजकीय तर्कवितर्क आहेत की त्यामागे एखादी मोठी राजकीय खेळी आकार घेत आहे, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.







