पुणे: आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकरी, भाविक आणि मानाच्या पालख्यांच्या वाहनांना टोलमाफी देण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे वारीसाठी प्रवास करणाऱ्या हजारो वारकरी आणि भाविकांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ६ जुलै ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मानाच्या पालख्यांच्या मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) टोल नाक्यांवर कोणतेही टोल शुल्क आकारले जाणार नाही. ही सवलत केवळ आषाढी वारीसाठी जाणाऱ्या पालख्या, वारकरी आणि भाविकांच्या वाहनांसाठी लागू असेल.

टोलमाफीचा लाभ घेण्यासाठी वाहनांवर ‘आषाढी एकादशी २०२६’ असा उल्लेख असलेले अधिकृत स्टिकर किंवा पास लावणे आवश्यक राहणार आहे. या स्टिकरवर वाहन क्रमांक आणि चालकाचे नाव नमूद केले जाईल. हे स्टिकर आणि पास संबंधित पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस शाखा, वाहतूक चौक्या आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हेच पास परतीच्या प्रवासातही वैध असतील.

टोल नाक्यांवर वाहतूक सुरळीत राहावी यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त, ट्रॅफिक वॉर्डन आणि आवश्यक मनुष्यबळ तैनात करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच महामार्ग सुरक्षा पथकांनाही सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
याशिवाय, राज्य परिवहन महामंडळाला वारीच्या काळात अतिरिक्त एसटी बस उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. टोलमाफीमुळे संबंधित टोल कंत्राटदारांना होणाऱ्या महसुली नुकसानीची भरपाई राज्य सरकारकडून करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे आषाढी वारीसाठी राज्यभरातून पंढरपूरकडे जाणाऱ्या लाखो वारकरी आणि भाविकांचा प्रवास अधिक सुलभ होणार असल्याचे सांगितले जात आहे.







