Loni Kalbhor News : लोणी काळभोर, ता. 10 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेला मंगळवारी (ता. 10) सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरिअल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. त्यामुळे परीक्षा केंद्र परिसरात सकारात्मक आणि उत्साही वातावरण निर्माण झाले होते.

लोणी काळभोर येथील केंद्रावर प्राचार्य सीताराम गवळी यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करत त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. “बारावी ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. आत्मविश्वास, शांत मनःस्थिती आणि नियोजनबद्ध अभ्यासाच्या जोरावर प्रत्येक विद्यार्थ्याने यश मिळवावे,” असे आवाहन त्यांनी केले. यावेळी परीक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
याप्रसंगी केंद्र संचालक प्रा. सदानंद साळुंके, सहाय्यक केंद्र संचालक प्रा. अर्जुन कचरे, प्रा. संतोष वडर, शशिकांत शेंडगे, प्रा. जगदीप तिकोणे, प्रा. जितेंद्र साळुंखे, हवेली तालुका माध्यमिक शिक्षण संघटनेचे सचिव भाऊसाहेब महाडिक यांच्यासह शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पहिलाच पेपर असल्याने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह दिसून येत होता. या परीक्षा केंद्रात पृथ्वीराज कपूर मेमोरिअल हायस्कूलचे 491, चिंतामणी विद्यालय थेऊरचे 44, एमआयटीचे 270, एंजेल हायस्कूलचे 110, फुरसुंगी येथील लिटल फ्लॉवर ज्युनिअर कॉलेजचे 56 तसेच वडकी येथील मोडक इंटरनॅशनल ज्युनिअर कॉलेजचे 15 असे एकूण 986 विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते. मात्र 8 विद्यार्थी गैरहजर राहिल्याची माहिती सहाय्यक केंद्र संचालक अर्जुन कचरे यांनी दिली.
दरम्यान, परीक्षेदरम्यान कोणतेही गैरप्रकार घडू नयेत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती कार्यरत करण्यात आली असून भरारी पथके, मंडळ सदस्य व शासकीय अधिकाऱ्यांच्या आकस्मिक भेटींचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.






