पुणे, ता. 6: हडपसर येथील एका महाठगाने दहा महिन्यात दामदुप्पट रकमेचे आमिष दाखवून Big Fraudster in Hadapsar) महाराष्ट्रातील हजारो नागरिकांकडून 4 हजाराहून अधिक कोटी रुपयांची अनधिकृत माया गोळा केली आहे. या संस्थेच्या बोगस कारभाराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लेखी तक्रारी गेल्या आहेत. मुख्यमंत्री साहेबांनी या तक्रारींची दखल घेऊन संबंधित संस्थेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आर्थिक गुन्हेशाखेच्या रडारवर ही संस्था आली आहे. अशी संस्था कधीही डबघाईला येऊ शकते. त्यामुळे गुंतवणूकदारांनो आत्ताच पैसे काढून घ्या. अन्यथा दामदुप्पट तर सोडाच, पण तेलही गेले, तूपही गेले, हाती राहिले धुपाटणे, अशी अवस्था होऊ शकते.

हडपसर (पुणे) येथील एका बोगस संस्थेने शेतकरी, उद्योजक, महिलावर्ग व सर्वसामान्य नागरिकांना दहा महिन्यात दामदुप्पट रकमेचे आमिष दाखविले आहे. या अमिषाला बळी पडून पुणे, सोलापूर नगरसह राज्यातील 12 हून अधिक जिल्ह्यातील शेतकरी, उद्योजक, महिलावर्ग व सर्वसामान्य नागरिक अडकले आहेत. संस्थेने कुठलाही शासकीय परवाना नसतानादेखील हजारो कोटी रुपये जमा केले आहेत. सुरवातीला काही महिने गुंतवणूकदारांना परतावा दिला आहे. परंतु, मागील दोन महिन्यांपासून गुंतवणूकदारांना कोणताही परतावा दिला जात नाही. गुंतवणूकदारांना केवळ तारीख पे तारीख दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. त्यामुळे सामान्य गुंतवणूकदार हतबल झाले आहेत.

हडपसर येथील या पठ्ठ्याने नागरिकांना फसवण्यासाठी मार्केटिंगचा एक नवीन फंडा रचला आहे. नागरिकांकडून रोख आणि ऑनलाइन पद्धतीने रक्कम एका फर्मच्या नावाखाली गोळा केली आहे. शेअर मार्केट व ऑनलाइन बिजनेसच्या नावाखाली काही व्यावसायिकांकडून करोडो रुपयांची गुंतवणूक करून घेतली आहे. तसेच झिरोपासून हिरो बनवण्यासाठी शक्कल लढवून मोठी माया गोळा केली आहे. दामदुप्पट रकमेचा परतावा देण्यासाठी ‘समर्थ’ असलेल्या पठ्ठ्याने आता कंपनीचे नाव बदलले आहे. तसेच शेतकऱ्यांचा बेकायदा पैसा इतर कंपन्यांमध्ये वर्ग केला आहे. त्यामुळे आता अनेक बोगस कंपन्या उदयास आल्या आहेत.

दरम्यान, आजवर असे अनेक फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत. त्यामध्ये मुंबईचा टोरेस व फिनिक्स इन्व्हेस्टमेंट घोटाळा, श्रीगोंदा येथील इन्फिनिटी बिकन, बार्शीचे फटे, बीडचे तिरुमाला, तळेगाव ढमढेरेमधील “नरके घोटाळा” या सर्व घोटाळ्यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे हडपसर येथील या ठगाने केलेल्या मार्केटिंगच्या भूलभुलैय्यामध्ये लाखो गुंतवणूकदार अडकले असून त्यांनी 4 हजार कोटींहून अधिक रुपयांची गुंतवणूक केली आहे. मात्र या संस्थेच्या कोणत्याही योजना अधिकृत नसून कधीही बंद पडू शकतात. त्यामुळे या गुंतवणुकीमध्येही नागरिकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाली तर महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा आर्थिक फसवणुकीचा घोटाळा ठरू शकतो.
गुंतवणूक परत मिळत नसेल तर पोलीस ठाण्यात तक्रार द्या
गुंतवणूकदारांनो आतातरी मोह आवरा, सावध व्हा, आपली मोठी फसवणूक होण्यापूर्वीच काळजी घ्या. दहा ते वीस टक्के प्रतिमाह परतावा इम्पोर्ट एक्स्पोर्ट व्यवसाय असो अथवा कुठल्याही क्षेत्रात दिला जात नाही. म्हणून यापूर्वीचे अनुभव पाहता सर्वांनी आपली गुंतवणूक लवकर काढून घेण्याबाबत विचार करावा. अन्यथा तुमची फसवणूक नक्की होऊ शकते. तसेच संबंधित कंपनी अथवा संस्था तुमची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत असेल तर जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करा. त्या तक्रारीची कॉपी ‘पुणे प्राईम न्यूज’च्या http://www.puneprimenews@gmail.com वर पाठवा. आम्ही तुमच्या तक्रारीचा पाठपुरावा करून आवाज उठविण्याचा प्रयत्न करू.
फुगा कधीही फुटू शकतो?
इम्पोर्ट एक्स्पोर्ट, शेअर मार्केट किंवा क्रॉप व्यवसायाच्या नावाखाली 5 वर्षात हजारो कोटींचा मालक आजपर्यंत कोणीही झालेला नाही. या प्रकरणात गुंतवणूकदारांकडून घेतलेला पैसा नेमका जातो कुठे? याबाबत कोणालाही कल्पना नाही किंवा शेतकऱ्यांच्या मालाची मार्केटिंग केली जाते की नाही. याबाबतही खात्रीशीर माहिती अद्यापपर्यंत पुढे आलेली नाही. या कंपनीने जास्त सुशिक्षित लोकांना जवळ केले नसल्याची माहिती समोर आहे. त्यामुळे हा फक्त फसवणुकीचा एक नवीन फंडा असून कधीही फुटू शकतो.







