पुणे: राज्यात ८ ऑगस्ट रोजीही अनेक भागांत पावसाची शक्यता कायम असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून, काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह सरी कोसळू शकतात. मात्र, या भागासाठी कोणताही हवामान इशारा जारी करण्यात आलेला नाही.

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक तसेच नाशिक घाटमाथा आणि अहिल्यानगर परिसरात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांतही पावसाची शक्यता कायम आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथा भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. मात्र, या जिल्ह्यांसाठी कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नाही.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, बीड आणि धाराशिव येथे हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पाच जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांसाठी कोणताही विशेष हवामान इशारा देण्यात आलेला नाही. अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांत वातावरणात बदल जाणवू शकतो. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरीही पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.







