पुणे: सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या प्रवासी गर्दीमुळे तिकीट मिळण्यात होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने इंदूरहून मुंबई, खडकी (पुणे), पाटणा आणि श्रीगंगानगर या मार्गांवरील पाच विशेष रेल्वेगाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. या निर्णयामुळे नियमित गाड्यांवरील ताण कमी होण्यास मदत होणार असून प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढणार आहे.

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, मुंबई-पुणे-श्रीगंगानगर मार्गावरील विशेष गाड्यांच्या फेऱ्या ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. तर महू-इंदूर-पाटणा विशेष रेल्वेची सेवा ऑक्टोबरच्या सुरुवातीपर्यंत सुरू राहणार आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

नवीन वेळापत्रकानुसार, इंदूर-मुंबई विशेष रेल्वे (09085/09086) मुंबईहून 28 ऑगस्टपर्यंत आणि इंदूरहून 29 ऑगस्टपर्यंत धावणार आहे. तर इंदूर-मुंबई विशेष (09079/09080) मुंबईहून 30 ऑगस्टपर्यंत आणि इंदूरहून 31 ऑगस्टपर्यंत प्रवाशांच्या सेवेत राहणार आहे.
याशिवाय, इंदूर-खडकी (पुणे) विशेष रेल्वे (09324/09323) इंदूरहून 26 ऑगस्टपर्यंत आणि खडकीहून 27 ऑगस्टपर्यंत धावणार आहे. महू-इंदूर-पाटणा विशेष (09343/09344) पाटणाहून 1 ऑक्टोबरपर्यंत आणि महूहून 2 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. तसेच इंदूर-श्रीगंगानगर विशेष (04736/04735) श्रीगंगानगरहून 13 ऑगस्टपर्यंत आणि इंदूरहून 14 ऑगस्टपर्यंत धावणार आहे.
मुंबई, पुणे आणि पाटणा या मार्गांवर वर्षभर मोठ्या प्रमाणात प्रवासी गर्दी आणि प्रतीक्षा यादी असते. त्यामुळे या मार्गांवर अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्याची मागणी सातत्याने होत होती. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे सणासुदीच्या काळात अधिक जागा उपलब्ध होणार असून हजारो प्रवाशांना त्याचा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रेल्वे तज्ज्ञांनीही अशा विशेष गाड्या कायमस्वरूपी सुरू करण्याची मागणी केली आहे.






