पुणे : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चा रंगल्या असताना आता बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीवर प्रश्न विचारताना काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर निशाणा साधला. त्यांच्या शांत राहण्यावर बोट ठेवत काँग्रेसने “सुनेत्रा पवार आणखी किती काळ ‘गुंगी गुडिया’ बनून राहणार?” असा सवाल उपस्थित केला आहे. त्यांच्या या नव्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या भाषेचा जोरदार तीव्र निषेध केला आहे. राजकीय मतभेद कितीही असले तरी महिला नेत्यांबाबत अशी अनुचित आणि अपमानास्पद भाषा वापरणे चुकीचे आहे, असे दमानिया म्हणाल्या. राजकारणात एकमेकांवर टीका करताना भाषेचा दर्जा आणि महिलांचा आदर राखला गेला पाहिजे, अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली.

सत्ताधारी आणि विरोधकांमधील या ताज्या कलहामुळे राजकीय संवादाच्या घसरत्या पातळीवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. विरोधकांवर टीका करताना नेत्यांनी भाषेचे भान ठेवायला हवे, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत. या संपूर्ण प्रकरणावर सुनेत्रा पवार किंवा त्यांच्या पक्षाकडून अधिकृत विधान आलेले नाही. आगामी काळात हा मुद्दा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बीड दौऱ्यातील घडामोडींवरून हा राजकीय वाद पेटला आहे. आता यावर राष्ट्रवादी काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.







