पुणे : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसने ‘गुंगी गुडिया’ अशी अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन वैयक्तिक टीका केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना आणि भाजपकडून या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त होत आहे. दुसरीकडे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षाच्या अधिकृत अकाऊंटवरून केलेल्या या विधानाचे जाहीर समर्थन केले.त्यामुळे आता त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे.

काँग्रेसच्या या भूमिकेनंतर सत्ताधाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर ताशेरे ओढत म्हटले की, महाविकास आघाडीतील नेत्यांना जनतेकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. फक्त प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी आणि चर्चेत येण्यासाठीच ही खालच्या पातळीवरची विधाने केली जात आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेत आणि संस्कृतीत इतक्या निकृष्ट दर्जाची वक्तव्ये होणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते संजय काकडे यांनी या संपूर्ण प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. काँग्रेसच्या अशा मनोवृत्तीमुळे महाराष्ट्राची जनता त्यांना निवडणुकीत योग्य धडा शिकवेल, असा इशारा त्यांनी दिला. काकडे यांनी थेट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्याकडे हर्षवर्धन सपकाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून तात्काळ हटवले पाहिजे, अशी आक्रमक मागणी करत जर त्यांनी हे विधान मागे घेऊन माफी मागितली नाही, तर काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याला राज्यात मोकळेपणाने फिरू दिले जाणार नाही आणि त्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल, असा इशारा काकडे यांनी दिला आहे.

केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि सुपारी घेऊन अशी वक्तव्ये केली जात असल्याचा घणाघातही संजय काकडे यांनी केला. एका महिला नेत्याबद्दल इतक्या हीन दर्जाची टिप्पणी करणाऱ्या काँग्रेस अध्यक्षांची पदावर राहण्याची लायकीच उरलेली नाही, असे म्हणत त्यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. या प्रकरणामुळे काँग्रेस आणि महायुतीतील नेत्यांमध्ये मोठा वाद पेटला आहे.







